पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत भाजपचे राजकारण 'धर्माचे राजकारण ते पैशाची दलाली' असे म्हटले आहे. रोहित पवार यांनी आरोप केला की, ही जागा गिळंकृत करण्याचे बरेच प्रयत्न झाले होते, परंतु सामान्य नागरिकांनी आवाज उठवताच बिल्डर्ससोबत झालेली डील भाजपला स्थगित करावी लागली, असे पवार म्हणाले. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले, राजकीय वरदहस्त असलेल्या लुटारू टोळींने जैन बोर्डिंगची जागा गिळंकृत करण्याचे बरेच प्रयत्न केले, परंतु या जागेबाबत आरोपांची राळ उठताच आणि जैन समाज व सामान्य नागरिकांनी आवाज उठवताच बिल्डर्सबरोबर झालेली डील स्थगित करावी लागली. आता जैन बोर्डिंगची जागा पुन्हा ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे समजत आहे. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, इतके दिवस सरकार एकच सांगत होते की, यामध्ये कोणताही गैरव्यवहार नाही. मग गैरव्यवहार झाला म्हणून जागा पुन्हा ट्रस्टकडे सुपूर्द केली जात असेल तर सरकारच्या जवळच्याच कुणालातरी यामधे मोठ्या प्रमाणात नफेखोरी करायची होती हे स्पष्ट होतय. निवडणुका आल्या की जाती धर्माचं राजकारण करून राजकीय पोळी भाजायची आणि पैशाचा विषय आला की सरसकट दलाली खायची. हाच भाजपचा खरा चेहरा आणि मोडस ऑपरेंडी आहे. या प्रकरणात देखील त्यांना हेच करायचे होते मात्र लोकांनीच यांचा बुरखा फाडल्यामुळे माघार घ्यावी लागली. भाजपच्या याच राक्षसी वृत्ती आणि प्रवृत्ती पासून प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले. दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलचा विषय चांगलाच चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार आता सर्वांचेच लक्ष याकडे लागले असून महायुतीमध्ये देखील या मुद्द्यावरून अंतर्गत मतभेद असल्याचे समोर आले आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/hdGgtlM
धर्माचे राजकारण अन् पैशांचा विषय आला की दलाली खायची:हाच भाजपचा खरा चेहरा, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रोहित पवारांची टीका
October 29, 2025
0