राष्ट्रीय महामार्गावर पैलपाडा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात बोरगाव मंजू येथील तिघे जण जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाला. मृतांत पती-पत्नीचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू शहरात शोककळा पसरली, तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू भीम नगर येथील धीरज शाळीग्राम सिरसाठ (वय ३५) व त्यांची पत्नी अश्विनी धीरज सिरसाठ (वय ३०) हे दोघेही आपले वाहन (छोटा हत्ती क्रमांक एम. एच. ३०- एबी २००६) घेऊन मंगळवारी रात्री खेर्डा (ता. कारंजा) येथे आपली नाश्ता व चायनीजच्या व्यवसायाची गाडी लावण्यासाठी जात असताना वाटेत पैलपाडागावाजवळ वाहनात बिघाड झाल्याने ते पुढील प्रवासासाठी न जाता ते बोरगाव मंजू येथे परत येण्यासाठी निघाले. बोरगाव मंजू येथे येण्यासाठी त्यांनी दुसऱ्या वाहनचालकांना टोचन लावून नादुरुस्त गाडी बोरगाव मंजू येथे घेऊन जाण्यासाठी बोलावले असता आरिफ खा अहेमद खा (वय २८) व अन्वर खा अब्दुल खा (वय २५) हे दोघे नादुरुस्त गाडीजवळ पैलपाडा गावाजवळ पोहोचले. समोरच्या टाटा गाडीतून उतरुन गाडीचे टायर पाहत असताना अचानक मूर्तिजापूर कडून बोरगाव मंजूकडे जाणाऱ्या एका मालवाहू अज्ञात वाहनाने रस्त्याच्या बाजूला उभ्या धीरज सिरसाठ, अश्विनी सिरसाठ, आरिफ खा व अन्वर खा या चार जणांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात धीरज सिरसाठ, अश्विनी सिरसाठ व आरिफ खा यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्वर खान हे गंभीर जखमी झाले. भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला बहीण-भावांचे छत्र हरपले बोरगाव मंजू येथील अपघातात ठार झालेले धीरज सिरसाठ अश्विनी सिरसाठ हे दोघे पती-पत्नी अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. धीरज हे कुटुंब प्रमुख आई वडील, पत्नी एक मुलगा व एक मुलीसह राहत हाते. मुले प्राथमिक शाळेत शिकत आहे तर धीरजचे आई- वडील वृद्ध आहेत. अर्ध्यावर फुललेल्या संसाराचा गाडा हाकणारे कुटुंबप्रमुख गेल्याने या दोन्ही चिमुकल्यांचे छत्र हरपले आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Wz0Pl5I
मालवाहू वाहनाची धडक; तिघे जागीच ठार:राष्ट्रीय महामार्गावरील पैलपाडा गावाजवळ अपघात; मृतात पती-पत्नीचा समावेश
October 22, 2025
0