Type Here to Get Search Results !

गुढीपाडवापासून गुरुकुंज आश्रमात रामनामाचा अखंड निनाद:२६ मार्चपर्यंत अभिषेक, ध्यान, भजन, कीर्तन, गोपाळकाला व महाप्रसाद

तिवसा येथील गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने 'गुढीपाडवा व रामनवमी महोत्सव' भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने आयोजित केलेला हा सोहळा १९ मार्च रोजी गुढीपाडव्यापासून २६ मार्चपर्यंत चालणार आहे. यामध्ये अध्यात्म, संस्कार आणि सामूहिकतेचा संगम अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाची सुरुवात १९ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी तीर्थ स्थापना, अभिषेक, महापूजा आणि सामुदायिक ध्यान यांसारख्या धार्मिक विधींनी झाली. पहाटे सादर होणारी भजनांजली भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा देत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ, शेंदोळा खुर्द यांच्या वतीने करण्यात आले आहे. संपूर्ण आठवडाभर आश्रम परिसरात रामकृष्णहरी नामाचा अखंड गजर, सामूहिक प्रार्थना, ध्यान-चिंतन आणि विविध भक्तीपर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. गावोगावातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असून गुरुकुंज आश्रम परिसरात भक्तीचा दरवळ पसरला आहे. या सोहळ्याला डॉ. नंदकिशोर काळे, डॉ. डी.एस. निघोट, उद्धवराव वानखडे, डॉ. पी.पी. पाडेकर, डॉ. खारोडे, डॉ. रघुनाथ वाडेकर, संजयभाऊ देशमुख, आशिषदादा कावडे, कैलासजी गिरी, पंकज देशमुख आणि सद्गुणदादा ठोसर यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, सेवा आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असून, सर्व स्तरातील नागरिकांनी यात सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महोत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या रामनवमीला विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी रामकृष्णहरी अभिषेक, भव्य महापूजा, सामुदायिक ध्यान व चिंतन, गोपाळकाला, हरिपाठ व कीर्तन होणार आहे. यानंतर हजारो भाविकांसाठी महाप्रसाद व सामुदायिक प्रार्थना आयोजित करण्यात आली आहे. गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमातील महासमाधी स्थळी मानवतेचा संदेश देणारी गुढी उभारण्यात आली. यामुळे यंदाचा गुढीपाडवा सण सामाजिक जाणिवा आणि सेवाभाव यांचा अनोखा संगम ठरला. पहाटेपासूनच आश्रम परिसरात भक्तांची वर्दळ सुरू होती. वेदमंत्र, भजन आणि प्रार्थनांच्या सुरांनी वातावरण प्रसन्न झाले होते. सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यानंतर मानवसेवा छात्रालयातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रांगेत महासमाधी स्थळी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Fxq1OlK

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.