Type Here to Get Search Results !

अखेर का कोसळली होती मराठ्यांवर संक्रांत?:1761 च्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाने बदलला भारताचा इतिहास; पाहुया ऐतिहासिक मतमतांतरे

पेशवाईच्या शे-सव्वाशे वर्षांच्या कालखंडात अनेक गौरवशाली घटना घडल्या. अटकेपार मराठी झेंडा फडकवण्याची घटना जशी याच काळात घडली, तसा पानिपतच्या युद्धात मिळालेला मानहानीकारक पराभवही याच काळात सोसावा लागला. पानिपतच्या रणांगणावर मराठ्यांच्या पदरी पडलेल्या पराभवास आज बरोबर 264 वर्षे झाली. तरीही या पराभवाची जखम आजही मराठ्यांच्या मनात कायम भळभळत राहते. त्यामुळेच ही जखम कुरवाळण्यात आणि तो पराभव नेमका कुणामुळे झाला? याची कारणमिमांसा करणे आपल्याला आवडते. चला तर मग आज दिनविशेषमध्ये पाहू पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची कहाणी... सर्वप्रथम पाहू पानिपतच्या 3 लढायांचे महत्त्व पानिपतच्या रणांगणावर भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या 3 महत्त्वाच्या लढाया लढल्या गेल्या. पानिपतच्या मैदानावर पहिली लढाई 21 एप्रिल 1526 रोजी दिल्लीचा शासक इब्राहीम लोदी व काबूलचा सुलतान जहीरुद्दीन मुहम्मद उर्फ बाबर यांच्यात झाली. बाबर हा सैन्य व अनुभवाच्या बाबतीत इब्राहीम लोदीपेक्षा कमी होता. पण तोफखाना ही त्याची जमेची बाब होती. या युद्धात इब्राहीम लोदी मारला गेला आणि दिल्लीत मोगल साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पानिपतची दुसरी लढाई मुघल बादशहा जलालुद्दीन मोहम्मद अकबर व सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य उर्फ हेमू यांच्यात झाली. एकेक्षणी हेमू हे युद्ध जिंकण्याच्या स्थितीत होता. पण अचानक एक बाण हत्तीच्या अंबरीवर बसलेल्या हेमूच्या डोळ्यात शिरला आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर युद्धाला कलाटणी मिळाली. हेमूला कैद करण्यात आले. अकबराचा सरदार बहराम खान याने हेमूचा शिरच्छेद केला. नोव्हेंबर 1556 मध्ये झालेल्या या युद्धामुळे मोगलांची सत्ता बळकट झाली. पानिपतची तिसरी लढाई ही मराठा सेनापती सदाशिवरावभाऊ व अफगाण शासक अहमदशहा अब्दाली यांच्यात झाली. 14 जानेवारी 1761 रोजी लढले गेलेले हे युद्ध अब्दालीने जिंकले. या युद्धामुळे मोगलांची भारतातील सत्ता पूर्णतः खिळखिळी झाली आणि अस्ताला गेली. पानिपतचे तिसरे युद्ध का लढले गेले? औरंगजेब हा मुघल साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली बादशहा होता. त्याच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी आपले वर्चस्व वाढवण्यास सुरुवात केली. त्यांनी दक्षिणेतील अनेक प्रादेशिक राज्य काबीज करून एका मोठ्या भूभागावर आपले वर्चस्व सिद्ध केले. दुसरीकडे, 1739 मध्ये 'तख्त - ए - तौस' (मयूर सिंहासन) व 'कोहिनूर' हिरा हिसकावून घेणाऱ्या नादिर शहाने भारतावर केलेल्या आक्रमणामुळे मुघलांचे लवकर पतन झाले. नादिर शहाच्या मृत्यूनंतर अहमदशहा अब्दाली हा अफगाणचा शासक बनला. त्याने दुर्राणी साम्राज्याची स्थापना केली. भारतावर वर्चस्व सिद्ध केल्यानंतर त्याच्या मुलाचा लाहोरच्या युद्धात पराभव झाला. त्यानंतर त्याने स्वतः भारतावर चाल करून येण्याची योजना आखली. अहमदशहा अब्दालीने 1759 च्या अखेरीस लाहोर जिंकले. त्यानंतर 1760 साली तो खैबर खिंडीतून पेशावरमार्गे दिल्लीवर चालून आला. त्याच्यासोबत अफाट सैन्य होते. हे पाहून पतनाला लागलेल्या मोगलांनी मराठ्यांची मदत मागितली. त्यानुसार मराठ्यांनी सेनापती सदाशिवरावभाऊंच्या नेतृत्वात आपले सैन्य त्यांच्या मदतीला दिल्लीच्या दिशेला रवाना केले. सदाशिवरावभाऊ 2 ऑगस्टला दिल्लीत पोहोचले सदाशिवरावभाऊ 14 मार्च 1760 रोजी परतूरहून निघाले. ते 2 ऑगस्टला दिल्लीला पोहोचले. त्यांचा आग्रा येथे यमुना पार करून अब्दालीशी अंतर्वेदीमध्ये (गंगा-यमुनेतील दुआबाचा प्रदेश) दोनहात करण्याचा हेतू होता. पण दुथडी भरून वाहणाऱ्या यमुनेमुळे त्यांची योजना बारगळली. त्यानंतर सप्टेंबर 1760 च्या अखेरीस मराठ्यांनी पानिपतच्या मैदानावर मोर्चेबांधणी केली. मराठ्यांनी 16 ऑक्टोबर रोजी कुंजपुरा किल्ल्यावर धाड घालून अब्दालीची रसद लुटली. यामुळे अब्दाली बिथरला. त्यानंतर 24 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत मराठ्यांच्या नकळत बांधपत येथे त्याच्या सैन्याने यमुना ओलांडली. मराठ्यांच्या दक्षिणेला त्यांनी मोर्चेबंदी केली. येथून त्याने पद्धतशीरपणे अगडबंब मराठा फौजेची रसद रोखली. यामुळे सदाशिवरावभाऊ कोंडीत सापडले. यामुळे मराठा सैन्याची वाताहत सुरू झाली. उपासमारीने त्यांचे हाल झाले. परिणामी, त्यांनी 13 जानेवारी 1761 रोजी त्यांनी ही कोंडी फोडण्यासाठी चढाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 14 जानेवारी 1761 हा संक्रातींचा दिवस उजाडला. कशी होती मराठ्यांची व्युहरचना? पश्चिमेस पानिपत भोवतालचा खंदक व पूर्वेस यमुना यांच्या मध्यभागी मराठा सैन्य पश्चिम - पूर्व सरळ रेषेत तैनात होते. पश्चिमेस होळकर व शिंद्यांच्या तुकड्या, मध्यभागी भाऊसाहेब व विश्वासराव यांची शाही हुजरात होती. त्यांच्या शेजारी विठ्ठल शिवदेव, दमाजी गायकवाड, विंचूरकर व अंताजी माणकेश्वर यांच्या तुकड्या होत्या. पूर्वेच्या कोपऱ्यात इब्राहिमखान गारदी यांची तुकडी होती. भाऊंच्या मागे समशेर बहाद्दूर, यशवंतराव पवार, सटबोजी जाधव, नाना पुरंदरे यांचे दस्ते होते. दुर्दैवाने भाऊंनी राखीव अशी कोणतीही फौस ठेवली नव्हती. नंतर हीच त्यांची घोडचूक ठरली. अब्दालीने मराठ्यांच्या व्युहरचनेची सूक्ष्मपणे निरीक्षण केले. त्यानंतर त्याने आपल्या सैन्याची रचना तिरप्या रेषेत केले. कदाचित अब्दालींचा हिंदुस्तानी गिलच्यांवर पू्रण विश्वास नव्हता. त्यामुळे दोन्ही कडांना अफगाणी तुकड्या उभ्या केल्या होत्या. शाहपसंद पश्चिमेस, त्यानंतर नजीब व शुजाउद्दौलाच्या तुकड्या, मध्यभागी त्याचा सेनापती शहावलीचा कणा, त्याच्या पूर्वेस बुंदेखान, सदुल्ला या रोहिल्यांच्या तुकड्या व सर्वात पूर्वेस बर्खुरदार व अमीरबेग यांची अफगाणी फौजा. या सर्वांच्या मागे दक्षिणेला काही अंतरावर अब्दालीची 15 हजारांची राखीव किजलबाजांची तुकडी सज्ज उभी होती. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सदाशिवरावभाऊंसारखा अब्दाली आघाडीवर नव्हता. शहावलीवर लढाईची जबाबदारी सोपवून तो आणीबाणीच्या काळात महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी पिछाडीला एका मोक्याच्या ठिकाणी उभा होता. तो दुर्बिणीच्या माध्यमातून लढाईवर नजर ठेवून होता. राखीव तुकडीची योजना व अब्दालीचे मागे राहणे हे नंतर अब्दालीच्या विजयाचे महत्त्वाचे घटक ठरले. भाऊंनी इब्राहिमखान गारदीच्या सूचनेनुसार गोलाईच्या लढाईची रणनिती स्वीकारली. पुढे तोफखाना, मग बंदुकीची, मागे, पुडे, बाजूला सैनिक आणि मध्यभागी बाजारबुणगे यांनी पुढे सरकत जायचे ही त्यामागची कल्पना. इब्राहीमखान गार्दीची आपल्या तोपखान्यावर अपार श्रद्धा होती. विशेषतः भाऊंचाही त्याच्यावर विश्वास होता. सर्व फळ्या शाबूत ठेवून प्रथम शत्रूसैन्याला तोफखान्याने भाजून काढण्याचा त्यांचा हेतू होता. पण शिंदे व होळकरांनी या रणनितीला विरोध केला. सकाळी 8 च्या सुमारास लढाईला सुरुवात 14 जानेवारी 1761 रोजी सकाळी 8 च्या सुमारास मराठ्यांनी सर्व संकटे विसरुन निकराने लढाईला सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी जोरदार तोफमारा झाला. गारदीने बर्खुदारखानाच्या आघाडीस खिंडार पाडले. इब्राहिमखान पुढे सरकणार तोच दमाजी गायकवाड, विठ्ठल शिवदेव गोल सोडून पुढे धावले. बिन बंदुकीचे घोडेस्वार पाहून माघारी जाणाऱ्या रोहिल्यांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. यामुळे त्यांना मार खाऊन परत यावे लागले. पण या धामधुमीत इब्राहिमखानाला तोफांचा मारा करता आला नाही. त्याचवेळी भाऊंच्या हुजराती तुकडीने शाहवलीला मागे रेटले. त्यामुळे गिलच्यांच्या गोटात निराशा पसरली. शिंदे - होळकरांच्या तुकड्यांना मात्र नजीबने यशस्वीपणे रोखून धरले होते. दुपारी 1 वाजेपर्यंत युद्धात मराठ्यांनी आघाडी घेतली होती. याचवेळी अब्दालीने थकलेल्या मराठ्यांवर राखीव किजलबाजांची फौज धाडली. यामुळे अचानक पारडे पलटले. सूर्य दक्षिणायनात असल्याने भर दुपारी उत्तरेकडून दक्षिणेकडे चाल करून जाणाऱ्या घोड्यांच्या डोळ्यांत सूर्यकिरणे जाऊ लागली. ते बुजू लागले. यामुळे उपासमारीने रोडावलेले व थकलेले घोडे व त्यावरील स्वार सैनिक कोसळू लागले. त्याचवेळी दिलपाक घोड्यावर बसून लढणाऱ्या विश्वासरावांना 2 च्या सुमारास गोळी लागली. त्यातच भाऊही जखमींची पाहणी करण्यासाठी आपल्या हत्तीवरून उतरले. त्यावेळी मराठ्यांना ते त्यांच्या जागेवर दिसले नाहीत. त्यामुळे आपला पाडाव झाला असे मराठ्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी पळापळ सुरू केली. सायंकाळी 4 पर्यंत अब्दालीच्या सैन्याने मराठ्यांची निर्घृण कत्तल सुरू केली. त्यातून बुणगे, यात्रेकरू कुणीच वाचले नाही. स्त्रियांची प्रचंड विटंबना झाली. या युद्धात विश्वासराव पेशवे, सदाशिवराव भाऊ, जनकोजी शिंदे, असे अनेक मातब्बर मराठा सरदार मारले गेले. इब्राहिमखान गारदीचाही यात मृत्यू झाला. इतिहासकारांच्या मते, या युद्धात दोन्ही बाजूंचे एक लाखांहून अधिक सैनिक मारले गेले. पानिपतच्या या लढाईने भारतातील सत्तेची समीकरणेच बदलून टाकली. मराठ्यांचा सर्वांगीण अन् संपूर्ण पराभव झाला पानिपतचे तिसरे युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे ठरले. इंग्रज इतिहासकार एल्फीस्टनच्या मते, पानिपतमध्ये मराठ्यांचा जसा सर्वांगीण व पूर्ण पराभव झाला असा क्वचितच कुणाचा झाला असेल. त्यामुळे मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व त्यांचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही. त्यामुळे 14 जानेवारी 1761 रोजी मराठ्यांवर संक्रांत कोसळली असे म्हटले जाते. पानिपतच्या युद्धाच्या दुसऱ्या दिवशी अनुपगीर गोसावी व काशीराज यांनी रणक्षेत्राला भेट दिली. तेव्हा त्यांना प्रेतांचे 32 ढीग दिसून आले. त्यात 28 हजार प्रेते होती. याशिवाय दूरपर्यंत प्रेतांचे खच पडले होते. या लढाईत 90 हजार स्त्रियांना व मुलांना गुलाम बनवण्यात आले. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीम खान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे ही मातब्बर मंडळी मारली गेली. मराठ्यांची कर्ती पिढीच या लढाईत नष्ट झाली. पानिपतमधून वाचलेले मराठे 15 दिवसांनी ग्वाल्हेरला पोहोचले. सुरजमल जाटाने 20 हजार नग्न मराठ्यांना घोंगड्या व प्रत्येकी 2 रुपये दिले. इतकी दुर्दशा मराठ्यांची झाली होती. पानिपतमधील पराभवामुळे मराठ्यांच्या तलवारीचा उत्तरेतील धाकही नष्ट झाला होता. अब्दालीचा शेवटचा विजय पानिपतच्या लढाईत अब्दालीला मोठा विजय मिळाला. पण त्याचा त्याला फार मोठा लाभ झाला नाही. उपासमारीने मरणाऱ्या मराठ्यांच्या छावणीत त्याला कोणतेही द्रव्य मिळाले नाही. दिल्लीची संपत्तीही आधीच लुटली गेली होती. त्यामुळे तिथेही त्याच्या हाती फार काही लागले नाही. त्यामुळे ओसाड व भयानक औदासिन्य पसरलेल्या उत्तरेत अधिक काळ राहण्यास अब्दालीच्या सैन्याने नकार दिला. अब्दालीला मात्र सधन पंजाब प्रांत कायमस्वरुपी आपल्या ताब्यात रहावा असे वाटत होते. त्यामुळे मायदेशी परतताना तो पंजाबमध्ये गेला. पण तिथे त्याला शीखांचा प्रचंड प्रतिकार सहन करावा लागला. शीखांनी अब्दालीशी 1767 पर्यंत संघर्ष केला. पंजाब मुक्त केला. यामुळे अब्दालीचे कष्ट वाया गेले. त्यानंतर 14 एप्रिल 1772 रोजी त्याचा मृत्यू झाला. दोन मोती गळाल्या, 27 मोहोरा गमावल्या... पानिपतमध्ये सदाशिवरावभाऊ संकटात असल्याची खबर नानासाहेब पेशव्यांना उशिरा समजली. पण त्यानंतरही त्यांनी तिकडे कूच करण्याची तयारी केली. मार्गक्रमण करताना त्यांना उत्तरेतील खबरी मिळणेच बंद झाले. यामुळे नानासाहेब पेशवे चिंतातुर झाले. त्यानंतर भेलसा येथे मुक्कामी असताना 24 जानेवारी रोजी त्यांना पानिपतच्या पराभवाची माहिती मिळाली. त्यांना मिळालेल्या एका सांकेतिक पत्रात 2 मोती गळाले, 27 मोहोरा गमावल्या, चांदी व तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही असा निरोप मिळाला. भाऊ, मुलगा व अनेक नातलगांच्या मृत्युचा नानासाहेबांना फार मोठा धक्का बसला. त्यांची मनःशांती नष्ट झाली. त्यांनी दिल्लीत न जाता परतण्याचा निर्णय घेतला. पानिपतवर कुचराई केल्याविषयी पेशव्यांनी शिंदे, होळकर, पवार यांच्या महालांची जप्ती केली, पण ती काही काळापुरतीच. त्यानंतर नानासाहेबांची भ्रमिष्ठ होऊन तब्येत खालावत गेली. त्यातच 23 जून 1761 रोजी त्यांचा मृत्यू झाला व मराठेशाहीला आणखी एक धक्का बसला. मराठ्यांच्या पराभवाची कारणे पानिपतच्या तिसऱ्या युद्धाविषयी इतिहासकारांना काय वाटते? पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा मराठ्यांच्या भाग्यावर काय परिणाम झाला? याविषयी इतिहासकारांची मते भिन्न स्वरुपाची आहेत. मराठा इतिहासकारांचे असे मत आहे की, या युद्धात 75 हजार व्यक्तींशिवाय मराठ्यांनी राजकीय महत्त्वाचे असे काहीच गमावले नाही. अब्दालीलाही विशेष असा कोणताही लाभ मिळाला नाही. रियासतकार सरदेसाई म्हणतात, युद्ध क्षेत्रावरील मराठ्यांच्या सैनिकी हानीशिवाय या युद्धाचा कोणताही निर्णायक प्रभाव पडला नाही. या घातक युद्धातूनन वाचलेल्या महादजी शिंदे व नाना फडणवीस या दोन मुख्य व्यक्तींनी मराठा शक्तींचे पुनरुज्जीवन करून पुन्हा त्यांचे भाग्य उदयास आणले. पानिपतच्या युद्धानंतर लवकरच मराठे पुन्हा शक्तीशाली बनले व नंतरच्या 40 वर्षांत एक शक्ती म्हणूनच राहिले. महादजी शिंदे यांच्या मृत्यूपर्यंत किंवा दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धात इंग्रजांकडून पराभूत होईपर्यंत मराठा एक शक्ती होती. पानिपतचे युद्ध एखाद्या नैसर्गिक दुर्घटनेप्रमाणे होते. त्यात जीवितहानी झाली, परंतु त्याचा कोणताही राजकीय प्रभाव पडला नाही. पानिपतच्या पराभवाने मराठ्यांचे सर्वोच्च स्थापन प्राप्तीचे स्वप्न भंगले असे म्हणणे म्हणजे तत्कालीन परिस्थिती समजून न घेणे होय. याविषयी रियासतकार सरदेसाई म्हणतात, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे की ज्यावेळी ऐतिहासिक कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर दोन शक्ती... मराठे व मुसलमान आपल्या जीवन - मरणाचा संघर्ष करीत होते, त्याचवेळी भारतातील इंग्रजी साम्राज्याचे संस्थापक क्लाईव्ह भारतात इंग्रजी राज्याच्या संभाव्यतेविषयी इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड चॅथम यांच्याशी चर्चा करयाण्यासाठी इंग्लंडला जात होता. अप्रत्यक्षपणे पानिपतच्या युद्धाने भारतातील सर्वोच्च स्थानासाठी एक नवा प्रतिस्पर्धी निर्माण केला. खरे तर या युद्धाचा हा सरळसरळ परिणाम होता व त्याने भारतीय इतिहासाला एक नवे वळण दिले. सर जदुनाथ सरकारांचे वेगळे मत या युद्धाविषयी सर जदुनाथ सरकार म्हणतात, पानिपतच्या युद्धाच्या परिणामांची तीव्रता कमी करून दाखवणे ही मराठा इतिहासकारांची एक परंपराच बनलेली आहे. परंतु भारतीय इतिहासाचे वास्तविक परीक्षण स्पष्टपणे सांगते की, हा दावा म्हणजे उग्र राष्ट्रवाद होय. हे ठीक आहे की, 1772 मध्ये मराठा सैन्याने निर्वासित मुघल सम्राटाला पुन्हा दिल्लीच्या सिंहासनावर बसवले. पण मराठे त्यावेळी राजनिर्माते नव्हते किंवा मुघल साम्राज्याच्या नाममात्र मंत्री किंवा सेनापतींचे वास्तविक स्वामीही नव्हते. हे गौरवशाली पद महादजी शिंदेला 1789 मध्ये व इंग्रजांना 1803 मध्ये प्राप्त झाले. सर जदुनाथ सरकारांचे हे मत अधिक निरपेक्ष वाटते. मराठ्यांची अतिशय हानी झाली हे वास्तव आहे. एक लाख सैनिकांमधून काहीच वाचले. आपल्या सरदारांचे काय झाले आणि हानी किती झाली याचे अनुमान खुद्द पेशव्यालाही तीन महिन्यांपर्यंत आले नाही. एवढेच नाही तर शोकग्रस्त पेशव्याचा मृत्यूही लवकरच झाला. सरकार पुढे म्हणतात, या युद्धाचा परिणाम म्हणजे बाळाजी बाजीरावसहीत जवळजवळ सर्व मराठा प्रमुख नेत काळाच्या पडद्याआड केले आणि त्यामुळेच रघुनाथरावांसारख्या स्वार्थी व्यक्तीला पुढे येण्याची संधी मिळाली. इतर नुकसान भरुन काढण्यासारखे होते, पण कर्तृत्वसंपन्न पिढी पुन्हा येण्यासारखी नव्हती आणि हेच खरे पानिपतच्या पराभवाने झालेले नुकसान होते. सरदेसाई हे मत फेटाळून लावतात रियासतकार सरदेसाई यांना हे मत मान्य नाही. ते म्हणतात, पानिपतने मराठ्यांना राजकारण व युद्धक्षेत्र यातील एक नवा अनुभव प्रदान केला. त्यामुळे त्यांची राजकीय आकांक्षा अधिकच बळावली. या महासंकटाने मराठ्यांच्या संकल्पात कुठेही तडजोड झाली नाही. कारण राष्ट्रमार्गात असे चढउतार येतच असतात. दत्ताजी व जनकोजी शिंदे, सदाशिवराभाऊ, इब्राहिमखान गारदी या महान सेनानींचे मृत्यू वाया गेले असे नाही. आपल्या राष्ट्रावर (मराठा राज्य) त्यांची अमिट छाप उमटली आणि पुढे माधवराव पेशव्याच्या रुपाने ती दृष्टोत्पत्तीस आली. मृत्यूमधूनच नवी उत्पत्ती होते हे सत्य आहे. एक पिढी समाप्त झाली परंतु तिची जागा घेण्यास नवी पिढी उदयास आली. त्यामुळे राज्यकार्य पूर्ववत सुरू झाले. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाने पानिपतची विपत्ती आपली उत्पत्ती मानली आणि राष्ट्रासमोरचे नवे आव्हान पेलण्यास सर्वांनी कंबर कसली. पानिपतच्या युद्धाने निश्चितच राजकीयदृष्ट्या मराठ्यांच्या प्रतिष्ठेला जबर धक्का बसला. स्वतःची व आश्रितांची सुरक्षा न करू शकलेले मराठे पोकळ वाशासारखे दुर्बल मानले जाऊ लागले. संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्थापित करण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. 1772 व 1789 म्ध्ये त्यांनी मुघल सम्राटाला संरक्षण दिले हे खरे आहे पण पंजा व मुलतान प्राप्त करण्याचा किंवा सीमेचे समंरक्षण करण्याचा प्रयत्न मराठ्यांनी पुन्हा केला नाही. या युद्धाविषयी सिडनी ओवन म्हणतात, यामुळे काही काळ मराठा शक्ती नष्टभ्रष्ट झाली. ही शक्ती समाप्त झाली नसली तरी तिची इतकी वाताहात झाली की, तिला सुप्तावस्थेचे स्वरुप आले आणि ती जेव्हा जागृत झाली त्यावेळी तिच्याशी सामना करण्यास इंग्रज सिद्ध झाले होते. एवढेच नव्हे तर इंग्रजांनी मराठ्यांना पराभूत करून ती शक्ती नेहमी करिताच समाप्त केली. अशा प्रकारे या युद्धाने इंग्रजांच्या उदयाचा मार्ग सुकर केला.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ZHgeDTE

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.