Type Here to Get Search Results !

धुरंधर; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते?

मी साधू नाही. संत नाही. मी एक गरीब आहे. मला गरिबांविषयी कणव वाटते. त्यामुळे दारिद्र्य व अज्ञान यांच्या गाळात रुतलेल्या कोट्यवधी भारतीयांच्या मुक्तीचा मार्ग मी शोधतो आहे, अशा शब्दांत आपल्या जीवनाचे सहज सोपे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. यानिमित्ताने आज आपण 'धुरंधर'मध्ये पाहूया विवेकानंदांच्या अल्पशः पण थोर आयुष्याची कथा... नरेंद्रनाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद हे भारतीय इतिहासातील एक महान आध्यात्मिक गुरु, विचारवंत व समाजसेवक होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथील एका बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त, तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. नरेंद्र हे बालपणापासूनच हुशार होते. त्यांनी इतिहास, तत्त्वज्ञान व साहित्य यांचा सखोल अभ्यास केला होता. श्रीरामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरू होते. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणींचा प्रचार प्रसार करण्यासाठी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. या मिशनच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, आरोग्यसेवा व सामाजिक सेवा क्षेत्रात बहुमोल कार्य केले. आजही हे मिशन आपल्या सेवाकार्याने समाजात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. विवेकानंदांच्या विचारांद्वारे व कार्यांद्वारे त्यांनी भारतीय समाजाला नवचेतना दिली. त्यांच्या शिकवणीमुळे समाजात सेवा, समता व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले गेले. आधुनिक जगातील महान धर्मनिरपेक्ष नेते स्वामी विवेकानंद हे आधुनिक जगातील एक महान निधर्मी नेते होते. मानवतेचे उत्कृष्ट प्रेमी होते. त्यांचे सर्वच समाजातील व्यक्तींवर जात, वर्ग, पंथ, वंश, प्रांत किंवा धर्म असा कोणताही भेदभाव न करता बिनशर्त प्रेम होते. संघर्षातून निर्भय बनून शांततेने मानवतेचे सेवा करणे हेच त्यांच्या जीवनातील तत्त्वज्ञानाचे सार होते. विवेकानंदांच्या मते, खरे शिक्षण हेच व्यक्तीला अस्तित्त्वाच्या संघर्षासाठी तयार करते. शिक्षण हे माणसाला समाजसेवेसाठी, त्याच्या चारित्र्याचा विकास करण्यासाठी तयार करते. शेवटी त्याला सिंहाचा आत्मा व शौर्य आत्मसात करते. विवेकानंदांच्या मते, मनुष्याचा विकास हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय असते. मनुष्याचे शील आणि चारित्र्य निर्माण हे शिक्षणाचे महत्त्वाचे तत्त्व होय. मनुष्याच्या प्रवृत्ती आणि संस्कार मनुष्याच्या चारित्र्य निर्मितीसाठी अत्यावश्यक असतात. त्याच्या प्रवृत्ती आणि संस्कार त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या सवयी आणि स्वभाव बनतात. शिक्षणाद्वारे मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वात अशा प्रवृत्ती आणि संस्कार अनायास निर्माण झाल्या पाहिजेत. अशा सर्व प्रवृत्ती आणि संस्कारामधून मानवी जीवनाचे कल्याण साध्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ असणे हे शिक्षणाचे सर्वार्थाने ध्येय होय. मी साधू नाही, संतही नाही... मी फक्त गरीब विवेकानंद हे परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रणी समाजवादी नेते होते. 1 नोव्हेंबर 1896 रोजी मेरी हेल यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे आपण समाजवादी असल्याचे सांगितले होते. सर्वधर्म परिषदेनंतर वर्षभराने त्यांनी आपला विश्वासू शिष्य अलसिंगा पेरूमल यांना पत्र लिहिले. त्यात ते म्हणाले, मी साधू नाही. संत नाही. मी गरीब आहे. मला गरिबांविषयी प्रेम वाटते. विशेषतः मी दारिद्र्य व अज्ञान यांच्या गाळात रुतलेल्या 20 कोटी भारतीयांच्या मुक्तीचा मार्ग शोधतो आहे. याचा अर्थ विवेकानंदांना हे काम कठीण आहे याची पूर्ण जाणीव होती. स्वामी विवेकानंद यांनी 20 जून 1894 रोजी हरीदास बिहारीलाल देसाई यांना पत्र पाठवून कळवले होते की, हे माझे अभागी भाऊ खेड्यापाड्यात झोपडीत राहतात. ते हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन या तिन्ही राजवटीत भरडले गेलेत. त्यामुळे आपण माणूस आहोत हेच ते विसरून गेलेत. त्यांना त्यांच्या मनुष्यत्वाची जाणीव करून देण्यापासून आपल्याला सुरूवात करावी लागेल. याचा अर्थ विवेकानंदांना केवळ स्वातंत्र्य मिळवून काही फायदा नाही याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. विवेकानंदांच्या ऐतिहासिक भाषणाचा किस्सा स्वामी विवेकानंद 31 मे 1893 रोजी आपल्या ऐतिहासिक अमेरिका दौऱ्यावर निघाले. त्यांचे पेनिन्सुला नामक जहाज मद्रासच्या किनाऱ्यावरून अमेरिकेच्या दिशेने निघाले. वाफेच्या इंजिनाचे हे जहाज प्रथम कोलंबो, नंतर पेनांग, सिंगापूर, हाँगकाँग असे मजल दरमजल करत जपानच्या नागासाकीला पोहोचले. त्यानंतर जपानच्या याकोहामा बंदरावरून विवेकानंद 14 जुलै रोजी अमेरिकेला जाणाऱ्या 'इंप्रेस ऑफ इंडिया' नामक जहाजात बसले. या प्रवासात त्यांच्यासोबत भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा होते. या प्रवासात या दोघांत चांगल्या गप्पाटप्पा रंगल्या. त्यांच्यात मैत्रीचे धागे जुळले. ते अखेरपर्यंत कायम राहिले. 'इंप्रेस ऑफ इंडिया' अमेरिकेच्या बंदराला लागले. त्यानंतर विवेकानंद व्हँक्युव्हरहून शिकागोला जाणाऱ्या रेल्वेत बसले. शिकागोच्या धर्म परिषदेत सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील हजारो प्रतिनिधी आले होते. त्या सर्वांत विवेकानंदांचे वय फार कमी होते. गौतम घोष आपल्या द प्रोफेट ऑफ मॉडर्न इंडिया, स्वामी विवेकानंद, या पुस्तकात लिहितात, 'धर्म परिषदेतील वक्त्यांच्या क्रमवारीत विवेकानंदांचा क्रमांक 31 वा होता. पण त्यांनी आयोजकांना मला सर्वात शेवटी बोलू द्या अशी विनंती केली. त्यांची भाषणाची वेळ आली तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. तोंड कोरडेठाक पडले होते. विवेकानंदांकडे तयार भाषण नव्हते. पण डॉक्टर बॅरोज यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख केला तेव्हा विवेकानंदांनी मनात सरस्वतीचे स्मरण केले आणि ते व्यासपीठावर बोलण्यास उभे टाकले. 'अमेरिकेच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो', या शब्दांनी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यांचे हे शब्द ऐकताच सभागृहात उपस्थित प्रेक्षकांनी कौतुकाने उभे राहत त्यांच्या सन्मानार्थ 2 मिनिटे टाळ्या वाजवल्या.' टाळ्यांचा कडकडाट थांबल्यानंतर विवेकानंदांनी आपल्या छोटेखानी भाषणाला सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी जगातील सर्वात तरुण दैशांपैकी एक असणाऱ्या अमेरिकेचे जगातील सर्वात प्राचिन संस्कृती असलेल्या देशांपैकी एक असणाऱ्या भारतातर्फे आभार मानले. विशेषतः जगातील कोणताही धर्म दुसऱ्याहून अधिक चांगला किंवा वाईट नाही, सर्वच धर्म एकसमान असून, ते ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात, असे निर्भिड तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. त्यांचे हे भाषण चांगलेच गाजले. विवेकानंदांनी या दौऱ्यात अमेरिकेतील विविध शहरांत भाषणे केली. त्यांचे खूप कौतुक झाले. ते जवळपास वर्षभर अमेरिकेत होते. त्यानंतर भारतात परतताना ते इंग्लंडमध्येही थांबले. तिथे भारताविषयी आस्था असणाऱ्या प्रोफेसर मॅक्सम्युलर यांची त्यांनी ऑक्सफर्डमध्ये भेट घेतली. लाल-बाल-पाल नावाने प्रसिद्ध असणाऱ्या बिपीनचंद्र पाल यांनाही ते इंग्लंडमध्येच भेटले. त्यानंतर ते भारतात परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यात जागोजागी लोक उभे होते. स्वतःच केली होती स्वतःच्या आयुष्याची भविष्यवाणी स्वामी विवेकानंद यांनी आपल्या इवल्याशा आयुष्यात अनेक मोठी कामे केली. त्यांनी मृत्यूचेही शांतपणे स्वागत केले. त्यांनी मार्च 1900 सिस्टर निवेदिता यांना एक पत्र लिहिले होते. त्यात ते म्हणाले होते, मला आता कोणतेही काम करायचे नाही. माझी आता विश्रांती घेण्याची इच्छा आहे. मला त्याची वेळही माहिती आहे. तथापि, कर्म मला सातत्याने स्वतःकडे खेचत राहते. या पत्रात त्यांनी आपली शेवटची वेळ व ठिकाण माहिती असल्याचेही सांगितले होते. हे पत्र लिहिल्यानंतर 2 वर्षांनी त्यांचे निधन झाले. 1902 पासूनच त्यांनी स्वतःला सांसारिक गोष्टींपासून दूर करण्यास सुरुवात केली होती. ते फार कमी प्रश्नांची उत्तरे देत होते. ते अनेकदा सांगत, माझी आता जगाच्या कारभारात ढवळाढवळ करण्याची इच्छा नाही. त्यांनी रोमेन रोलँड यांना मी 40 वर्षांहून अधिक वर्ष जगणार नसल्याचेही सांगितले होते. स्वामी विवेकानंद यांनी 27 ऑगस्ट 1901 रोजी आपल्या ओळखीच्या मेरी हेल यांना एक पत्र लिहिले. या पत्रात ते म्हणतात, मी एकप्रकारे निवृत्त व्यक्ती आहे. आंदोलन कसे सुरू आहे, याची माहिती घेण्याची मला गरज वाटत नाही. सध्या मी अन्न-पाणी, झोप व इतर वेळेत स्वतःची काळजी घेण्याशिवाय दुसरे काहीही करत नाही. निरोप घेतो मेरी. या आयुष्यात कुठेतरी आपण निश्चितच भेटू. आपली भेट झाली नाही तरी हा तुझा भाऊ तुझ्यावर कायम प्रेम करत राहील. आपल्या मृत्यूपूर्वी 2 महिने अगोदर त्यांनी आपल्या सर्वच शिष्यांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी सर्वांना पत्र लिहून काहीकाळ बेलूर मठात येण्याची सूचना केली. त्यानंतर त्यांच्या जगभरातील शिष्याची पाऊले त्यांच्या मठाकडे वळली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधतानाही आपण हळूहळू आता आपल्या शेवटाकडे जात असल्याचे सूतोवाच केले. या काळात ते देशविदेशातील कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देत नव्हते. त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत होती. सुप्रसिद्ध बंगाली लेखक शंकर यांनी आपल्या 'द मोंक अ‍ॅज मॅन' या पुस्तकात विवेकानंद यांना झोप, यकृत, मधुमेह, किडनी, मायग्रेन व हृदय आदी 31 आजारांनी ग्रासल्याचा दावा केला आहे. त्यावेळी मधुमेहावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नव्हते. पण त्यांनी रोगांपासून मुक्ति मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे उपचार घेतले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचेही मानले जाते. आता पाहू विवेकानंदांचा शेवटचा दिवस कसा गेला? स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू 4 जुलै 1902 रोजी झाला. त्यांनी आपल्या मृत्यूच्या 2 दिवस अगोदर आपल्या सहकारी सिस्टर निवेदिता यांना स्वतःच्या हाताने वाढण्याचा हट्ट धरला होता. हात धुण्यासाठी निवेदितांच्या हातावर पाणी टाकताना निवेदिता म्हणाल्या, हे सर्व काही मी करायला हवे, तुम्ही नाही. त्यावर विवेकानंद उत्तरले, येशू ख्रिस्तही स्वतःच्या शिष्यांचे पाय धूत असत. आपल्या महासमाधीच्या दिवशी स्वामी विवेकानंद भल्या पहाटेच उठून बसले. त्यांनी गर्भगृहात जाऊन सर्व दरवाजे व खिडक्या बंद केल्या. तिथे त्यांनी 3 तास ध्यान लावले. दुपारचे जेवण आपल्या सहकारी साधूंसोबत घेतले. सायंकाळी 4 च्या सुमारास त्यांनी एक गरम कप दूध घेतले. त्यानंतर बाबूराम महाराजांसोबत शतपावलीसाठी बाहेर पडले. सायंकाळची प्रार्थनेची घंटा झाली तेव्हा ते आपल्या खोलीत परतले. तिथे गंगेच्या समोर ध्यान लावून बसले. रात्री 8 च्या सुमारास मठातील एका संन्याशाला बोलावून त्यांनी डोक्यावर पंखा घालण्याची सूचना केली. त्यावेळी बिछान्यावर पहुडलेले होते. त्यानंतर तासाभराने त्यांचे कपाळ घामाने डबडबले. हाताला काहीसे कापरे भरले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. हे सर्वकाही संपल्याचा संकेत होता. त्यावेळी रात्रीचे 9.10 वाजले होते. त्यावेळी तिथे हजर असणाऱ्या स्वामी प्रेमानंद व स्वामी निश्चयानंद यांनी स्वामी विवेकानंदांना जोरजोरात हाका मारत उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर डॉक्टर महेंद्रनाथ मजुमदार यांना बोलावण्यात आले. त्यांनी कृत्रिम श्वासोश्वास देऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण काहीच फायदा झाला नाही. अखेर रात्री उशिरा त्यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली. त्यांच्या मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे स्वामी विवेकानंद यांनी 39 वर्षे, 5 महिने व 22 दिवसांनी या इहलोकाचा निरोप घेतला. विशेषतः त्यांनी यापूर्वीच मी 40 वा वसंत ऋतू पाहू शकणार नाही अशी भविष्यवाणी केली होती. ती खरी ठरली. महात्मा गांधींनाही पडली होती भुरळ महात्मा गांधींनाही स्वामी विवेकानंद यांची भुरळ पडली होती. त्यांना त्यांची भेट घ्यायची होती. पण ते शक्य झाले नाही. महात्मा गांधी आपल्या माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकात म्हणतात, विवेकानंदांचे कार्य समजल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याविषयी हजारपट श्रद्धा वाढली. माझी त्यांना भेटण्याची इच्छा होती. कलकत्ता येथील वास्तव्यावेळी एकेदिवशी मी विवेकानंदांना भेटण्यासाठी मोठ्या उत्साहाने बेलूर मठाच्या दिशेने पायी निघालो होतो, पण रस्त्यात त्यांची प्रकृती बिघडल्याचे ऐकले. माझी खूप निराशा झाली. मी त्यांना भेटू शकलो नाही. महात्मा गांधी यांची विवेकानंदांशी भेट झाली नसली तरी ते सिस्टर निवेदिता यांना दोनदा भेटले होते. त्यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही केली होती. स्वामी विवेकानंदांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधी 30 जानेवारी 1921 रोजी त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ते बेलूरमठ येथे भाषण देताना म्हणाले होते, मला स्वामी विवेकानंदांबद्दल खूप आदर आहे. त्यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत. अनेक बाबतीत माझे आदर्श या महान व्यक्तिमत्वाच्या आदर्शासारखे आहेत. आज विवेकानंद हयात असते तर राष्ट्र जागृत करण्यात खूप मदत झाली असती. परंतु त्यांचा आत्मा आजही आपल्यामध्ये आहे. त्यामुळे आपण स्वराज्य स्थापनेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. महात्मा गांधी यांच्या या शब्दांवरून त्यांच्यावर स्वामी विवेकानंदांचा किती प्रभाव होता हे स्पष्ट होते. आता पाहू विवेकानंदांचे काही प्रेरक व रंजक किस्से 1) साधू अन् वानरांनी शिकवला धडा - एकदा स्वामी विवेकानंद बनारसच्या माँ दुर्गा मंदिरातून परत येत होते. तेव्हा रस्त्यात वानरांच्या टोळीने त्यांना घेरले. ते विवेकानंदांच्या हातातील प्रसाद हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होते. अचानक वानरांनी घेरल्यामुळे विवेकानंद घाबरले. ते पळू लागले. वानरेही त्यांच्या मागे लागली. तेव्हा रस्त्याशेजारी उभा असणारा एक वृद्ध साधू त्यांना म्हणाला, थांब. घाबरू नको. त्यांचा सामना कर व मग पाहा. तू जेवढा पळशील, तेवढे ते तुला पळवतील. साधूचे हे शब्द ऐकताच विवेकानंद मागे फिरले. निर्धाराने वानरांच्या दिशेने जाऊ लागले. हे पाहून वानर एकेक करून तेथून निघून गेले. या घटनेतून विवेकानंदांनी एक मोठा धडा घेतला. तो म्हणजे, तुम्हाला एखाद्या गोष्टी भीती वाटत असेल तर त्यापासून पळून जाऊ नका. मागे वळा व त्याचा निर्धाराने सामना करा. 2) श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या पत्नीची शिकवण - स्वामी विवेकानंदांना एकदा शिकागोला जायचे होते. ते श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी शारदामणी मुखोपाध्याय यांच्याकडे परदेशात जाण्याची परवानगी मागण्यासाठी गेले. असे सांगितले जाते की, त्यावेळी शारदामणी स्वयंपाकघरात काहीतरी काम करत होत्या. विवेकानंद त्यांच्याकडे गेले व म्हणाले, मला परदेशात जायचे आहे. तुमची परवानगी हवी आहे. शारदामणी उत्तरल्या, मी परवानगी दिली नाही तर तू जाणार नाहीस का? हे ऐकल्यानंतर विवेकानंद शांत झाले. त्यानंतर शारदामणी इशारा करत म्हणाल्या, ठीक आहे. एक काम कर. तो समोरचा चाकू आणून दे. भाजी कापायची आहे. विवेकानंदांनी चाकू उचलून त्यांना दिला. त्यावर शारदामणी म्हणाल्या, तू माझे हे काम केलेस. त्यामुळे तुला परदेशात जाण्याची परवानगी आहे. विवेकानंदांना काहीच समजले नाही. त्यावर त्या पुन्हा म्हणाल्या, तू तो चाकू त्याच्या मुठीऐवजी टोकाला धरून मला दिलास. त्यावरून तू आपले विचार, शब्द व कृतीतून कुणाचेही नुकसान करणार नाहीस असे मला वाटते. 3) आईला एवढे पूजनीय का मानले जाते? - एकदा एक तरुण विवेकानंदांकडे आला. तो म्हणाला, मला वेदांताविषयी (वेदांचा निष्कर्ष) समजले आहे, पण आजपर्यंत या देशात आईला एवढे पूजनीय का मानले जाते? हे समजले नाही. त्यावर स्वामीजी हसे अन् म्हणाले, एक काम कर. मी 24 तासांनी तुला उत्तर देतो. पण माझी अट आहे की, तोपर्यंत तुला स्वतःच्या पोटावर 5 किलोचा एक दगड बांधून ठेवावा लागेल. तरुण म्हणाला, यात काय मोठी गोष्ट? मी आत्ताच बांधतो. विवेकानंदांनी त्यांच्या पोटावर दगड बांधण्याची सूचना केली. तो तरुण दगड बांधून घरी गेला, पण तासभर होत नाही तोच परत आला. तेव्हा स्वामी हसत म्हणाले, पोटावर बांधलेला हा दगड तुला तासभर सहन झाला नाही. विचार कर, एक आई आपल्या बाळाला 9 महिने स्वतःच्या पोटात ठेवून घरातील सर्व कामे करते. तरुणाच्या डोक्यात प्रकाश पडला. या जगात आईशिवाय दुसरे कुणीही एवढे सहनशील व धैर्यवान नाही, त्यामुळे आईहून मोठे या जगात कुणीही नाही हे त्याला पटले. 4) स्त्रीमध्ये मातृत्वाची भावना जागृत करणारा खरा पुरुष - एकदा एक परदेशी महिला विवेकानंदांकडे आली आणि म्हणाली, माझी तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. हे ऐकून स्वामीजी काहीसे चकीत झाले. ते म्हणाले, मी संन्यासी आहे. मी लग्न करू शखत नाही, पण तरीही तुला माझ्याशी लग्न का करायचे आहे? त्यावर ती महिला म्हणाली, मला तुमच्यासारखा मुलगा हवा आहे. त्यावर विवेकानंद विनम्रपणे म्हणाले, ठीक आहे. आजपासून मी तुझा मुलगा व तू माझी आई आहेस. आता तुला माझ्यासारखा मुलगा मिळाला आहे. विवेकानंदांचे हे बोल ऐकताच त्या महिलेने त्यांच्या पायावर लोटांगण घातले. विवेकानंदांच्या मते, प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्वाची भावना जागृत करणारा व स्त्रियांचा आदर करणारा व्यक्तीच खरा पुरुष असतो. आता सर्वात शेवटी वाचू विवेकानंदांचे काही प्रेरणादायी विचार

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/HzeqpoQ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.