Type Here to Get Search Results !

धुरंधर; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट

प्राचीन काळात वैधव्य ही एक आपत्ती मानली जात होती. लग्नानंतर स्त्रीला कौटुंबिक व सामाजिक प्रतिष्ठा मिळत असे, पण पतीच्या निधनानंतर तिची प्रतिष्ठा अचानक हरवली जात होती. समाजात तिला दुय्यम स्थान सहन करावे लागत होते. विशेषतः जर्मनी व इजिप्त सारख्या देशांत विधवांना नवऱ्याच्या थडग्यांत जिवंत पुरले जात असे. प्रारंभीच्या ख्रिस्ती समाजातही पुनर्विवाहाला फारसे प्रोत्साहन नव्हते. पुनर्विवाह हा विवाहपूर्व शरीरसंबंध अगर व्यभिचार यांच्या एवढाच निंद्य व ताज्य मानला जाई. नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याची परलोकातही सेवा करता यावी म्हणून स्त्रीने देहत्याग करावा अशी भावनाही तत्कालीन समाजात अस्तित्वात होती. त्यातूनच सतीच्या चालीचा प्रसार झाला. विधवेला सक्तीने पतीच्या चितेवर जीवंत जाळले जाऊ लागले. या अघोरी प्रथेला धार्मिक परंपरेचा मुलामा चढवण्यात आला. भारतातच नव्हे तर युरोपीयन संस्कृती व चीनमध्येही 14 व्या शतकापर्यंत ही प्रथा रूढ होती असे मानले जाते. पण हळूहळू ही प्रथा समाजातून हद्दपार झाली. त्यासाठी अनेक समाजसुधारकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. कंदुकुरी वीरेशलिंगम हे त्यापैकीच एक बुद्धीवादी विचारवंत होते. कंदुकुरी वीरेशलिंगम यांना आंध्र प्रदेशाच्या नवजागरणाचे जनक मानले जाते. ते केवळ साहित्यिकच नव्हे, तर एक समाजसुधारकही होते. त्यांनी लोकांना मध्ययुगीन रुढीवादी व अंधश्रद्धेतून बाहेर काढले. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या साहित्यिक व क्रांतिकारी कार्यांनी आंध्राच्या समाजावर एक अमिट छाप सोडली. चला तर मग दिव्य मराठीच्या 'धुरंधर' या विशेष मालिकेत आज पाहुया विधवा पुनर्विवाहासाठी स्वतःच्या आयुष्याची होरपळ सहन करणाऱ्या कंदुकुरी वीरेशलिंगम यांचा संघर्ष... सर्वप्रथम पाहुया कोण होते कंदुकुरी वीरेशलिंगम? कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु यांचा जन्म 16 एप्रिल 1848 रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुब्बारायडू, तर आईचे नाव पूर्णम्मा होते. दुर्दैवाने ते 4 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या चुलत्याने त्यांचे पालन पोषण केले. त्यांच्या मदतीने वीरेशलिंगम यांचे प्राथमिक शिक्षण झाले. 1869 मध्ये त्यांची मॅट्रिक झाली. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशातीलच कोरंगी गावात प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले. याच काळात त्यांचे लग्न राज्यलक्ष्मी यांच्याशी झाले. वीरेशलिंगम यांनी साहित्याचा अंधश्रद्धा व सामाजिक वाईटांचा अंधःकार दूर करण्यासाठी शस्त्रासारखा वापर केला. त्यांनी लेखनाची एक साधी, स्पष्ट व थेट लेखनशैली स्वीकारली. ते पहिले ते तेलुगु कादंबरीकार होते. 1880 साली त्यांची 'राजशेखर चरित्रमु' नामक कादंबरी प्रकाशित झाली. तेलुगु साहित्यात पहिला निबंध व पहिले आत्मचरित्र लिहिण्याचे श्रेय वीरेशलिंगम यांनाच जाते. त्यांचे 'स्वीयाचरित्र' हे तेलुगुतील पहिले आत्मचरित्र होते. त्यांनी आपल्या नाटकांद्वारे तत्कालीन सामाजिक कुप्रथांवर कोरडे ओढले. वीरेशलिंगम यांनी 1880 मध्ये 'व्यवहार धर्मबोधिनी' लिहिले. ते तेलुगुचे पहिले नाटक ठरले. त्याच वर्षी त्यांनी 'ब्रह्मा विवाहम' लिहिले. त्यात त्यांनी विडंबनाद्वारे स्त्री शिक्षणाच्या विरोधकांची खिल्ली उडवली. त्यांनी समाजातील पुरुषी वर्चस्वावर 'सत्यराज पूर्वदेसयात्रलु' लिहिले. वीरेशलिंगम स्वतः ब्राह्मण होते. पण त्यांनी ब्राह्मण्यवादावर टीका करण्यास केव्हाच मागेपुढे पाहिले नाही. त्यांच्या विविध नाटकांत ब्राह्मण पुरोहित व सत्तेतील ब्राह्मण यांच्या वृत्तीचे चित्रण होते. त्यांची विवेक दीपिका, प्रल्हाद, सत्य हरिश्चंद्र तिर्यग विद्वान महासभा आदी नाटके चांगलीच गाजली. वीरेशलिंगम यांनी अनेक प्रमुख साहित्याचे तेलुगुत भाषांतर केले. त्यांच्या मौल्यवान अनुवादांत प्रामुख्याने संस्कृत व इंग्रजी भाषेतील अनुवादांचा समावेश आहे. त्यांनी सामान्य तेलुगु वाचकांना आपल्या भाषांतराद्वारे प्रमुख संस्कृत व इंग्रजी ग्रंथांपर्यंत पोहोच उपलब्ध करून दिली. एक पुरोगामी लेखक अन् समाजसुधारक वीरेशलिंगम एक असामान्य लेखक होतेच, शिवाय एक पुरोगामी समाजसुधारकही होते. त्यांच्यावर 'ब्रह्म समाज' च्या विचारांचा व उपक्रमांचा फार पगडा होता. ते राजमुंद्रीचे जातीव्यवस्थेचे कट्टर समीक्षक अतमुरी लक्ष्मी नरसिंहम तथा बुद्धीवादी व समाजसुधारक केशवचंद्र सेन सारख्या विचारवंतांचा खूप सन्मान करत होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी 1874 मध्ये धवलेश्वरम व 1884 मध्ये राजमुंद्री येथील इंसिपेटा येथे मुलींची शाळा सुरू केली. स्त्री शिक्षणाला हातभार लावताना त्यांनी आपली पत्नी राज्यलक्ष्मी हिच्या शिक्षणासाठीही वेळ काढला. 1876 साली त्यांनी 'विवेकवर्धिनी' नामक मासिक सुरू केले. या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी निर्भयपणे सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला. त्यांनी महिला शिक्षणाचे महत्त्व व बालविवाहाविरोधात परखड लिखान केले. 1873 मध्ये त्यांनी 'स्त्री विद्या' नामक कवितासंग्रह लिहिला. या कवितासंग्रहाद्वारे त्यांनी महिला शिक्षणावर जोर दिला. त्यांनी अंधश्रद्धेचाही प्रखर विरोध केला. एवढेच नाही तर विधवा पुनर्विवाह व महिला शिक्षणाचा पुरस्कार करण्यासाठी 'साहित्यबोधिनी'चीही सुरुवात केली. एकटेच जात होते स्मशानात वीरेशलिंगम यांनी तत्कालीन समाजातील अंधश्रद्धेवरही कुठाराघात घातला होता. एक बुद्धीवादी म्हणून त्यांना रुढी, परंपरा, पूचाअर्चा करण्यात कोणताही रस नव्हता. त्यांचा भूत - प्रेतांच्या अस्तित्त्वावरही विश्वास नव्हता. भूत - प्रेतांचा सिद्धांत फेटाळण्यासाठी ते स्वतः रात्रीच्यावेळी एकटे स्मशानात जात होते. त्यावेळी तेलुगू जनतेच्या मनावर स्वार्थ, आळस व ढोंगीपणाचे गारुड आरुढ झाले होते. ते पाहून वीरेशलिंगम यांनी त्याविरोधात रान पेटवले. त्यांनी आपल्या लिखाणातून त्याविरोधात उघडपणे भाष्य करण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांना वेडे ठरवण्यात आले. हे बंगाल नाही, हे आंध्र आहे, तुमचे विचार येथे चालणार नाहीत, हे वीरेशलिंगम यांना सांगण्यात येत होते. विशेष म्हणजे वीरेशलिंगम यांचा विवाह 8 वर्षीय मुलीशी झाला होता. पण त्यांनी आपले उर्वरित आयुष्य बालविवाहाविरोधात लढण्यात गेले. पहिल्या तेलुगु नाटकाचे निर्माते तेलुगुचे पहिले नाटक कोणते? याविषयी बरेच मतभेद आहेत. काही विद्वान कोराडा रामचंद्र शास्त्री यांनी लिहिलेले 'मंजरी मधुकरियम' (1861) ला तेलुगु साहित्यातील पहिले नाटक मानतात. पण त्यात आधूनिक नाटकाचे घटक नाहीत. त्यामुळे वीरेशलिंगम यांनी लिहिलेले 'ब्रह्म विवाहमु' हे तेलुगुतील पहिले नाटक मानले जाते. 'ब्रह्म विवाहमु' हे एक व्यंगात्मक सामाजिक नाटक आहे. कोणतेही कर्मकांड किंवा विधिविधान करण्यासाठी पत्नीच्या सहकार्याची आवश्यकता असते, अशी त्या काळातील प्रचलित प्रथा होती. या नाटकातील मुख्य पात्र पेद्दैया (मोठे साहेब) विधुर असतात. तिसऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी 3 वर्षांच्या एका निरागस मुलीशी लग्न केले असते. पैशाच्या लोभापोटी पालकही आपल्या मुलीचा सौदा करतात. या सामाजिक कुप्रथेवर वीरेशलिंगम यांनी आपल्या नाटकातून जोरदार प्रहार केला. मुला-मुलींना विवाहासाठी बाध्य का केले जाते? वीरेशलिंगम आंध्र प्रदेशातील विधवा पुनर्विवाह चळवळीचे प्रणेते होते. 1879 साली विधवा पुनर्विवाहावर एक भाषण केले. या भाषणाने संपूर्ण आंध्र प्रदेशात खळबळ माजली. त्यांच्यावर त्यांच्याच जातीच्या लोकांनी कडाडून टीका केली. वीरेशलिंगम आपल्या अथिबल्य विवाहममध्ये म्हणतात, आपल्या देशात बालविवाहाची प्रथा खूप जुनी आहे. पण प्रश्न हा आहे की, या जगात आजही या प्रथेची गरज का आहे? एवढ्या कमी वयात मुली व मुलांना लग्नासाठी मजबूर का केले जाते? विवाहाशी संबंधित अन्याय केवळ गरिबीपर्यंतच मर्यादित नाही तर त्याहून अधिक व्यापक आहे. यावर विचार करून कुप्रथेचे हे चक्र तोडण्याची वेळ आली आहे. ..अन् लावून दिला पहिला विधवा पुनर्विवाह वीरेशलिंगम यांना कृष्णा जिल्ह्यातील तिरुवुरुचे नायब तहसीलदार ब्रह्मश्री दर्भा ब्रह्मानंदम यांनी एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी सीताम्मा नामक महिला आपल्या 12 वर्षीय गौरम्मा नामक बालविधवेचा पुनर्विवाह करण्यास तयार असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर वीरेशलिंगम यांनी गौरम्माला राजमुंद्री येथे आणले. तिला आपल्या पत्नीच्या देखभालीत आपल्या घरी ठेवले. त्यानंतर तिच्यासाठी योग्य वराचे संशोधन सुरू केले. त्यावेळी त्यांना आपल्या गोगुलापती श्रीरामुलु नामक एका माजी विद्यार्थ्याची आठवण झाली. श्रीरामुलु तेव्हा विझागच्या पोलिस मुख्यालयात कार्यरत होता. त्याने ताबडतोड त्यांची विनंती मान्य केली. श्रीरामुलु तेव्हा स्वतः विधुर झाले होते. काही काळापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. या दोघांचा पुनर्विवाह संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला. पण कुणालाही वर व वधू कोण? हे ठावूक नव्हते. राजमुंद्रीचे तत्कालीन महानिरीक्षक कर्नल फोर्टिस यांनी या विवाहासाठी सुरक्षा प्रदान केली. त्यांचे मित्र पेदा रामकृष्णय्या यांनी विवाहासाठी आवश्यक आर्थिक मदत प्रदान केली. अशाप्रकारे 11 डिसेंबर 1881 रोजी राजमुंद्रीत पहिला विधवा पुनर्विवाह संपन्न झाला. पण त्याची मोठी किंमत वीरेशलिंगम यांना मोजावी लागली. वीरेशलिंगम यांच्यावर त्यांच्या समाजाने बहिष्कार टाकला. एवढेच नाही तर नवदाम्पत्याच्या आई-वडिलांवरही बहिष्कार टाकण्यात आले. पण त्यानंतरही ते विचलित झाले नाही. त्यांनी आणखी काही विधवांचे पुनर्विवाह लावून देण्याचा चंग बांधला. त्यांनी आपल्या आयुष्यात तब्बल 40 विधवांचे पुनर्विवाह लावून दिले. दक्षिणेतील ईश्वरचंद्र सागर वीरेशलिंगम यांच्या मते, महिला पुनर्विवाहानंतर एक आनंदी जीवन जगू शकतात. पुराणमतवाद्यांच्या कठोर विरोधानंतरही त्यांनी 11 डिसेंबर 1881 रोजी आंध्र प्रदेशातील पहिला विधवा पुनर्विवाह लावून दिला. त्यानंतर संपूर्ण देशात ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. तत्कालीन अनेक समाजसुधारकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. 1898 मध्ये महादेव गोविंद रानडे यांनी त्यांना 'दक्षिणेतील ईश्वरचंद्र सागर' यांची उपमा दिली. आधुनिक आंध्र समाजाची पायाभरणी कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांविरोधातील सामाजिक अन्यायाविरोधात खर्च केले. त्यांनी आपल्या साहित्य कलाकृतींच्या माध्यमातून सामाजिक वाईटांचा निडरपणे सामना केला. एक समाजसुधारक म्हणून त्यांनी लोकांना प्रगतीशील पद्धतीने विचार करून त्यावर कार्य करण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी आपल्या काळात अनेक समाजसुधारणा करून एका आधुनिक आंध्र समाजाची पायाभरणी केली. वीरेशलिंगम यांच्या काळात म्हणजे 19 व्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण देशात सांस्कृतिक प्रबोधनाची एक लाट उसळली होती. सरंजामशाही ढासळली होती. देशात एक संवेदनशील मध्यमवर्ग तयार झाला होता. हा वर्ग व्यापक राष्ट्रीय व सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून विचार करू लागला. विशेषतः सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत सुधारणांची गरज असल्याचे या वर्गाच्या लक्षात आले होते. ज्याप्रमाणे हिंदी साहित्यातील इतिहासात भारतेंदु हरिश्चंद्र पुरोगामी चेतनेचे प्रतिनिधी होते, त्याच प्रमाणे कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु हे तेलुगु साहित्याच्या इतिहासातील पुरोगामी चेतनेचे प्रतिनिधी होते. त्यांनी समाजसुधारणा, भाषण व साहित्याच्या माध्यमातून प्रबोधनाचा संदेश दिला. वीरेशलिंगम यांनी 1895 साली 'सरस्वती नारद विलापामु' मध्ये देवी सरस्वती व देव ऋषी नारद यांच्यातील काल्पनिक संवादातील सृजन लघुकाव्याची निर्मिती केली. त्यात त्यांनी सरस्वती व नारद यांच्यातील संवादातून वक्तृत्व, कृत्रिम अलंकार, खोटा दिखाऊपणावर कोरडे ओढले. असे म्हणतात की, हे लघुकाव्य वाचल्यानंतर स्पेंसर यांच्या 'टियर्स ऑफ द म्युसेस'ची आठवण होते. त्यांनी श्रृंगार रसाशी संबंधित काव्यचनाही केली. सूखाची सरकारी नोकरी धुडकावली 1867 मध्ये त्यांचे वडील पेद्दाना यांचे निधन झाल्यानंतर घराचा रहाटगाडा ओढण्याची जबाबदारी वीरेशलिंगम यांच्यावर आली. त्यांनी सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केले. पण अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे लाचेची मागणी केल्यानंतर त्यांनी नोकरी नाकारली. त्यांना वकील व्हायचे होते. पण त्यांनी वकिली व्यवसायातील भ्रष्टाचार व कुजकेपण पाहून त्यांनी त्यापासून पाठ फिरवली. अखेरीस 1869 मध्ये ते कोरंगी गावात शिक्षक म्हणून नोकरीस लागले. तिथे त्यांनी 2 वर्षे काम केले. त्यानंतर पुन्हा राजमुंद्री लगतच्या धवलेश्वरम येथील इंग्रजी शाळेत ते प्रिन्सिपल म्हणून रुजू झाले. एक शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजवली, तसेच सामाजिक स्थितीचीही जाणीव करून दिली. 1876 मध्ये त्यांनी आपली नोकरी सोडली. त्यांनी विवेकवर्धिनी नामक एक मासिक सुरू केले. त्यानंतर त्यांनी सामाजिक वाईटांविरोधात जनजागृती करण्यास सुरुवात केली. हे मासिक प्रारंभी मद्रास येथून प्रकाशित होत होते. पण नंतर त्यांनी राजमुंद्रीतच एक छोटा छापखाना सुरू केला. त्यानंतर तेथूनच ते प्रकाशित होऊ लागले. वीरेशलिंगम यांनी या मासिकाद्वारे तत्कालीन समाजात प्रचलित असणाऱ्या भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, बालविवाह याविरोधात प्रखर लिखाण केले. एकप्रकारे वीरेशलिंगम हे बंगालच्या पुनर्जागरणाचा प्रभाव असणाऱ्या आंध्र प्रदेशातील सामाजिक सुधारणा चळवळी व नवजागरणाचे प्रणेते होते. वीरेशलिंगम हे केवळ उपदेशक नव्हते, तर त्यांनी जो उपदेश केला त्याला त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणले. त्यासाठी त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. विधवा पुनर्विवाहासाठी वीरेशलिंगम यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. विजयनगरम महाराजा गर्ल्स हायस्कूलमध्ये विधवा पुनर्विवाहाच्या बाजूने त्यांनी दिलेल्या भाषणांमुळे अनेक परंपरावादी नाराज झालेत. हा नीच माणूस कोण आहे? हा आपली मूल्य भ्रष्ट करण्यासाठी राजमुंद्रीत जन्माला आला आहे का? तो खरेच ब्राह्मण आहे का? असे अनेक अपशब्द त्यांच्याविरोधात बोलण्यात आले. वीरेशलिंगम यांनी परंपरेच्या नावाखाली वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या ढोंगीपणावरही बोट ठेवले. या लोकांचा विधवा पुनर्विवाहालाही विरोध होता. यामुळे ते अधिकच संतप्त झाले. त्यांनी या लोकांपुढे त्यांच्या ढोंगीपणाचा, त्यांच्या दुटप्पीपणा, आत्मकेंद्रीपणाचा आरसा ठेवला. यामुळे त्यांना आणखी टीकेचे वार सोसावे लागले. 27 मे 1919 रोजी घेतला अखेरचा श्वास तेलुगु साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कंदुकुरी वीरेशलिंगम यांचे 27 मे 1919 रोजी निधन झाले. कंदुकुरी वीरेसलिंगम पंतुलु, आधुनिक तेलुगू साहित्याचे 'गद्य ब्रह्म', पहिले कादंबरीकार, पहिले नाटककार, पहिले आत्मचरित्रकार, व्यावहारिक भाषा चळवळीचे प्रवर्तक असणाऱ्या कंदुकुरी वीरेशलिंगम यांच्याविषयी चिलामार्थी लक्ष्मी नरसिहंम यांनी खालील अवतरण व्यक्त केले होते, जे आजही त्याच्या समाधीवर लिहिले आहे. "तना देहमु, तना गेहमु, तना कालमु तना धनम्‌भु तना विद्‍या जगज्जनुलके विनियोगिंचिना घनुडी वीरेशलिंगकवि जनुलारा!" अर्थात, जनहितासाठी आपले तन, मन, धन, निवास, वेळ व ज्ञान अर्पण करणारे थोर महापुरुष म्हणजे वीरेशलिंगम आहेत. धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा... धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/SCxDgRm

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.