Type Here to Get Search Results !

दिव्य मराठी रिपोर्ताज:वाघ शिकार : एकाच ठिकाणी सहा ‘पाय सापळे’ सापडणारे गडचिरोली हे देशातील एकमेव ठिकाण

"कल्ला’ व "रूमाली’ टोळ्या कापडी पिशव्या विकण्याच्या बहाण्याने फिरत होत्या चंद्रपूर, गडचिरोलीत विदर्भात १६ आॅक्टाेबर २०२३ रोजी उघडकीस आलेल्या वाघ शिकार प्रकरणातील आरोपी जामिनावर सुटले आहेत. महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण कायद्यातील कमकुवत तरतुदींमुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात पकडण्यात आलेल्या आरोपींना सहज जामीन मिळाला आहे. “कल्ला’ आणि “रूमाली’ या टोळ्या कापडी पिशवी विकण्याच्या बहाण्याने जानेवारी २०२३ पासून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात टेहळणी करत फिरत होत्या. परंतु महाराष्ट्रातील वन विभागाला याचा पत्ताही नव्हता. आसाममध्ये २८ जून २०२३ रोजी बहेलिया टोळीकडे एक वाघाचे कातडे सापडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. १८ जुलै २०२३ रोजी राज्याच्या वन विभागातील ताडोबा अंधारीचे तत्कालीन क्षेत्र संचालक नंदकुमार काळे, आदेशकुमार शेंडगे, गायकवाड तिघे गेले होते. त्यांनी सविस्तर माहिती घेतली. या टोळीने सावली तालुक्यात दोन आणि गडचिरोली जिल्ह्यातील चातगाव येथे दोन अशा चार वाघांची शिकार केली होती. एकाच ठिकाणी सहा “पाय सापळे’ सापडणारे गडचिरोली हे देशभरातील एकमेव ठिकाण आहे. तत्कालीन तपास अधिकारी सोनल भडके यांनी आरोपपत्र सादर केले होते. महाराष्ट्राबाहेर केलेल्या शिकारीची माहिती इंटर्नल इंटेलिजन्स शेअरिंगमध्ये दिल्याने या टोळीने तामिळनाडूत केलेल्या शिकार प्रकरणांची माहिती मिळाली होती. गडचिरोली, चंद्रपूर वन विभागाने पकडलेले सर्व आरोपी जामिनावर आहेत, तर गुवाहाटीत पकडलेले पाचपैकी ४ तुरुंगात आहेत. वैद्यकीय कारणामुळे एकाला जामीन मिळाला आहे. वन्यजीव (संरक्षण) (आसाम सुधारणा) कायदा, २००९ मध्ये सुधारणा करणारे आसाम हे एकमेव राज्य आहे. आसाम वन कायदा यानुसार वाघासह वन्यप्राणी शिकार प्रकरणात १० वर्षे शिक्षा, जन्मठेप तसेच ७५ हजार दंड अशी तरतूद आहे. तिथे अजामीनपात्र गुन्हा आहे. महाराष्ट्रात ७ वर्षे शिक्षा आहे. कुऱ्हाड, भाल्याचा करायचे वापर आरोपी वाघाची शिकार करण्यासाठी लोखंडाचा पाय सापळा वापरत होते. ते पेंचीस, हातोडा, लोखंडी खुटी, कुऱ्हाड, फोल्डिंग चाकू, लोखंडी भाला, कैची, कानस, छन्नीचा वापर करीत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल आरोपपत्रात यातील आरोपी आहेत, तर काला राजू, ब्यारी, ग्यानी, नाथीया, ज्याेतीराम, रामभगत, मिसराम जाखड व जित हे आठ आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपपत्रात एकूण १८ जणांची नावे आरोपपत्रात पंजाब आणि हरियाणातील एकूण १८ आरोपींची नावे आहेत. यामध्ये सोनू सिंग रंजित सिंग (२४), दिवाण सिंग प्रभाती सिंग (६५), राजू सिंग गोपी सिंग (३२), पुजारी सिंग रामकुमार सिंग (२५), करमचंद प्रकाश सिंग (२२), कविता सोनू सिंग (२०), सावित्री दिवाण सिंग (४५), मैना राजू सिंग (२१), पूनम पुजारी बावरी (२०), केशर ओमप्रकाश (५०), करमचंद जागीरबाबू बावरी (३०), रूमाल सिंग प्रभू सिंग (४६), रामभगत हरिसिंग (३२), अर्जुन सिंग प्यारे सिंग (३९), आेमप्रकाश कुरुडिया (४५), रामदास गोपी (४०), मायादेवी प्रिया (५०) व राजवटी ओमप्रकाश (४०) यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. सातपुड्यात संघटित शिकारी टोळ्या सक्रिय झाल्याने वाढवली गस्त राज्यातील विविध व्याघ्र प्रकल्पांच्या आसपास विशेषतः सातपुडा येथे संघटित शिकारी टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. ताडोबा, पेंच, कार्बेट, अमनगड. पिलीभीत, वाल्मीकी, राजाजी आणि बालाघाट, गडचिरोली, चंद्रपूर यांसारखे सर्व व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालक आणि संबंधित अधिकाऱ्यानी तातडीने गस्त वाढवली होती. टायगर सेलची निष्क्रियता, एनजीओशी नसलेला समन्वय, एसओपीचे पालन न होणे, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक केंद्र निष्क्रिय असणे अशा अनेक कारणांमुळे हे वाघ शिकार प्रकरणे घडले होते. २०१३ मध्ये बहेलिया टोळीने महाराष्ट्रात केलेलया ११ वाघ शिकारींचा तपास केला होता. मारणारे म. प्र. तील कटनी येथील बहेलिया पारधी होते. तर कातडी बाहेर नेणारे बावरिया पारधी होते. २०२३ मधील प्रकरणात मारणारे आणि विल्हेवाट लावणारे पंचफुला हरियाणा भागातील बावरिया होते. मेळघाट वाघ शिकार प्रकरणातील मुख्य आरोपी रणजितसिंग बावरिया याचा मुलगा सोनू बावरिया २०२३ मधील वाघ शिकार प्रकरणात मुख्य आरोपी आहे. फक्त ५ लाखांत कातड्यांची विक्री : बावरिया टोळी साधारणत: ५ लाखांत एक कातडे विकत होती. कातडे कसे यावर पैशांची घासाघीस होत असे. एखादे कातडे एकसंध आणि सलग असेल तर ५.५० लाखापर्यंत किंमत मिळत होती. कुठे फाटले असेल किंवा खोचा पडला असेल तर किंमत कमी जास्त ठरत होती. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र याच कातड्याची किंमत १ ते ५ कोटींपर्यत आहे. गुवाहाटीतून पाच जण अटकेत वाघाच्या शिकारप्रकरणी गुवाहाटी येथून जुलै २०२३ मध्ये पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांनी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील शिकारींची माहिती दिली. एक टोळी मुक्कामाला असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली. सावली वनपरिक्षेत्रांतर्गत उपवनक्षेत्र व्याहाड खुर्द परिसरातील राजोली फाल येथे दोन वाघांच्या शिकार प्रकरणात पाच जणांना सावली वन विभागाने गुवाहाटी येथून अटक केली होती. गडचिरोली जिल्ह्यातील आंबेशिवणी परिसरातील वाघाची शिकार झाली होती. अतिशय क्रूरपणे मारायचे वाघास एक पाय लोखंडी सापळ्यात अडकल्याने जखमी वाघ विशिष्ट परिघाबाहेर फिरू शकत नसे. बहेलिया शिकारी वाघ किती अंतरापर्यंत फिरू शकतो हे तपासून एक वर्तुळ आखतात. त्याच्या बाहेर उभे राहून वाघाला हुसकावतात. वाघ उठून फिरायला लागला की लाकडाच्या ओंडक्याने त्याच्या डोक्याच्या मधोमध मारतात. याचे कारण शरीरावरील कातडी खराब होऊ नये म्हणून काळजी घेतात. थकून वाघ अर्धमेला होतो. त्याने डरकाळीसाठी तोंड उघडले की लोखंडी भाला तोंडात टाकतात. अशा पद्धतीने त्याला मारून कातडी सोलतात असे सूत्रांनी सांगितले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/vnr6myR

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.