महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीचा थरार काही तासांवर येऊन ठेपला आहे. स्व. बलभीमअण्णा जगताप क्रीडानगरीत १२५ किलो माती गटातून महेंद्र गायकवाड आणि गादी गटातून पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षेने यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. गटातील सुवर्णविजेता केसरी किताबासाठी भिडणार असून रविवारी सायंकाळी ७ वाजता अंतिम सामना रंगणार आहे. विजेत्या मल्लांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा व थार गाडी, तर उपविजेत्याला बोलेरो गाडी भेट देण्यात येईल. वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात राज्यातील ९०० पेक्षा अधिक मल्लांनी सहभाग नोंदवला. दुसरकडे, माती विभागात ७९ किलोमध्ये संदेश शिपकुले (सातारा), गादी विभागात ६१ किलोमध्ये अजय कापडे (कोल्हापूर), ६५ किलोमध्ये जोतिबा अटकळे (सोलापूर), ७१ किलोमध्ये शुभम मगर (सोलापूर) हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. पृथ्वीराज मोहोळची दमदार कामगिरी गादी विभागात पृथ्वीराजने पहिल्याच मिनिटात एकेरी पटावर ताबा मिळवत २ गुण कमावले. लागोपाठ दोनदा मोळी बांधून ४ गुण, स्टेपआऊटच्या नियमाने १ गुण, खिमेच्या पकडीतून पाठीमागे जात २ गुण मिळवले. मध्यंतरापूर्वीच तो ९-० गुणांनी आघाडीवर होता. मध्यंतरानंतर उरलेला १ गुण मिळवत त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. दुचाकी, सोन्याचा बक्षिसांचा वर्षाव माती विभागात ९ आणि गादी विभागात ९ अशा १८ वजनी गटांमध्ये ही स्पर्धा होत आहे. सर्व गटांमधील प्रत्येक विजेत्याला १ बुलेट, उपविजेत्याला दुचाकी आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या पैलवानाला अर्धा तोळा सोन्याची अंगठी अशी बक्षिसे दिली जातील.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/9SFN2oP
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा:महेंद्र गायकवाड, पृथ्वीराज मोहोळ, राक्षेने गाठली फायनल, विजेत्या मल्लाला मिळणार चांदीची गदा आणि थार, बोलेरो गाडी
February 01, 2025
0