विनयभंगाच्या केसमधून मला बाहेर काढा, अशी विनंती मंत्री जयकुमार गोरेंनी साक्षात दंडवत घालत कोर्टाच्या चेंबरमध्ये केली होती. यापुढे तुम्हाला कधीही त्रास देणार नाही, असे लेखी स्टेटमेंटही दिले होते, असे सांगून मी केस मागे घेतल्यानेच ते निर्दोष सुटल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे. तसेच प्रजासत्ताकदिनी मी उपोषणाला बसणार असल्याचे पत्र राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचा उद्योग त्यांच्याच कार्यकर्त्याने केल्याचा थेट आरोपही पीडितेने केला आहे. दरम्यान, आता १७ मार्चला विधानभवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचे पीडितेने सांगितले. माध्यमांना प्रतिक्रिया देताना पीडित महिलेने सांगितले की, हा संपूर्ण घटनाक्रम २०१५-१६ मधील आहे. आ. जयकुमार गोरेंनी प्रायव्हेट पार्टचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. तसेच मला व आईला घाणेरड्या शिव्या घातल्या होत्या. त्यानंतर मी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर दहा दिवस ते तुरुंगात होते. जामिनावर सुटल्यानंतर माझ्यावर २ कोटी रुपये खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला. खंडणी मागितली होती तर मी विनयभंगाची तक्रार दाखल करण्यापूर्वी गुन्हा दाखल करायचा होता. मी गुन्हा दाखल करायची वाट पाहत होता का? असा सवाल पीडितेने आ. जयकुमार गोरेंना उद्देशून केला. तसेच खंडणीचे ते प्रकरण खोटे असून त्याचे काय झाले ते आजतागायत कळालेले नाही. त्यामुळे माझे नाव पेपरमध्ये आले आणि त्याने मला बदनाम करायचे सुरू केले. ते आजपर्यंत सुरू असल्याचा आरोप पीडितेने या वेळी केला. पीडित महिलेने पुढे सांगितले की, ९ जानेवारी २०२५ रोजी पाठवलेले एक पत्र मला २२ जानेवारीला मिळाले. त्या पत्रात विनयभंगाच्या केसचा तपशील होता. तसेच २६ जानेवारी रोजी मी उपोषणाला बसणार असल्याचे त्यात म्हटले होते. राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना ते पत्र पाठवण्यात आले होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती दिल्यानंतर “एसपी साहेब तुम्हाला संपर्क करतील आणि कुणी पत्र पाठवलंय, त्याचा तपास करतील’ असे सांगण्यात आले. मात्र, तसे काहीच झाले नाही, असेही ती म्हणाली. राज्यपालांकडे खोट्या सहीची तक्रार जयकुमार गोरे म्हणाले, माझ्याविरोधात राज्यपालांकडे केलेल्या अर्जात ज्या व्यक्तीची स्वाक्षरी आहे त्या व्यक्तीने ही स्वाक्षरी त्यांची नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा खोटा आरोप करणाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याची मागणीदेखील गोरे यांनी केली आहे. गोरेंचे कार्यकर्ते मला बदनाम करत आहेत, महिलेचा आरोप आमदार गोरेंच्या विरोधात केलेली विनयभंगाची एफआयआर मागील चार महिन्यांपूर्वी दहिवडी परिसरात व्हॉट्सअॅपवर फिरत होती. अशा पद्धतीने आमदार गोरे आणि त्यांचे कार्यकर्ते मला बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एफआयआरप्रमाणेच त्यांच्याच कार्यकर्त्याने राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याचा उद्योग केला असल्याचे मी खात्रीने सांगते. त्यामुळेच एसपी तपासाला माझ्यापर्यंत आले नाहीत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, यावरून आता राजकारणही मोठ्या प्रमाणात तापले असून विरोधकांनी गोरेंवर टीका केली आहे. रोहित पवारांवर हक्कभंग दाखल करणार : गोरे रोहित पवार यांनी याच प्रकरणात माझ्याविरोधात वक्तव्य केले. त्यांच्यावरही मी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. ‘लय भारी’ नावाच्या यूट्यूब चॅनलने दीड वर्षापासून माझी, कुटुंबीयांची आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्याचे काम केले आहे. त्यात अगदी खालच्या पातळीवर जात माझ्यावर, पक्षावर आणि पक्षनेतृत्वावर टीका केली आहे. त्यामध्ये कुठेही तसे स्तर न पाळता या यूट्यूब चॅनलने माझी बदनामी केली आहे. यामुळे मी तुषार खरात चॅनलविरोधात हक्कभंग आणला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/6CcGpDb
मी केस मागे घेतल्याने मंत्री जयकुमार गोरे निर्दोष सुटले:महिलेने केला दावा, 17 मार्चला विधानभवनासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा
March 06, 2025
0