महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मराठी माणूस आणि परप्रांतीय लोकांमध्ये अनेकवेळा भाषेवरून वाद होताना दिसतात. मुंबईमध्ये राहायचे असेल तर मराठी भाषा बोलावी लागेल असा आग्रह मराठी माणसाचा असतो तर काही परप्रांतीय मराठी बोलण्यास स्पष्ट नकार देतात. यावरून अनेकदा वाद झाले आहेत आणि काही भागात अजूनही होतात. त्यात आता आणखी भर पडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलीच पाहिजे असे नाही, असे विधान केले आहे. त्यामुळे यावरून देखील वाद पेटण्याची शक्यता आहे. मुंबई येथील विद्याविहार येथील एका कार्यक्रमात बोलताना संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी म्हणाले, मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य महाराष्ट्राचे मंत्री व भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या समोरच केले आहे. पुढे बोलताना भैय्याजी जोशी म्हणाले, मी मंगल प्रभात लोढा यांचे अभिनंदन करतो, आजच्या कार्यक्रमानंतर जाम साहेब यांचे सुद्धा नाव चर्चेत असेल. या ठिकाणी आल्यावर मला महाराणा प्रताप यांचे नाव डोळ्यासमोर आले. महाराणा प्रताप आणि अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल आपण ऐकले आहे. ज्यांच्याबद्दल आज आपण ऐकले आहे, असे जाम साहेब सुद्धा आहेत. आपल्यातल्या अनेकांनी त्यांना पाहिले आहे. मुंबई ते कन्याकुमारी त्यांनी काम केले आहे. जामसाहेब यांचे नाव या संस्थेला आहे, हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. बिर्ला मंदिर अनेक ठिकाणी आहेत, बिर्ला यांनी अनेक मंदिर बांधले पण आतमध्ये देवता कोण आहे, त्यात जाऊन पहावे लागते. चांगले जीवन साधनेमधूनच प्राप्त होते. अशा प्रकारची मधुरता त्यांच्या बोलण्यात होती, असे म्हणत भैय्याजी जोशी जोशी यांनी जाम यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. ज्यांनी साधना फक्त भारत मातेसाठीच करण्याचा संकल्प केला, त्यांचा दायरा हा हिंदू धर्म आणि भारतमाताच राहिला आहे. हे कर्मशीलता फक्त एका कामासाठी नाही तर असे जाम साहेब योगी म्हणून असतात. छत्रपती शिवाजी महाराज असे एक मात्र राजा आहेत, ज्यांना श्रीमंत योगी म्हणतात. भारताच्या परंपरेत असे महापुरुष असतात असे महापुरुष स्वतःला अहंकारापासून मुक्त करण्यासाठी आपण जे कार्य करतो ते ईश्वराचा कार्य आहे असे म्हणतात. म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, असे शिवाजी महाराज म्हणायचे, असेही भैय्याजी जोशी म्हणाले. पुढे भैय्याजी जोशी म्हणाले, संघाच्या शाखेत काम करणारा प्रत्येकजण ईश्वरी कार्य करत आहे. स्वयंसेवक नावाची ही शक्ती आहे, त्या शक्तीच्या रूपाने प्रत्येकजण काम करतो. जे स्वतःसाठी जगतात ते पशु समान असतात आणि दुसऱ्यासाठी जगतात ते खरे आयुष्य जगतात आणि त्यांनाच मनुष्य म्हणावे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/2FGxRUE
घाटकोपरची भाषा गुजराती:मुंबई येणाऱ्याने मराठी शिकलीच पाहिजे असे नाही, भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य
March 05, 2025
0