राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे. हवामान विभागाने येत्या तीन दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई आणि उपनगरातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरले असून, शेतकरी वर्गाला मोठा फटका बसला आहे. आज, 16 ऑगस्टच्या पहाटेपासून मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. काल रात्री 11 वाजल्यापासून आज सकाळी 5 वाजेपर्यंत मुसळधार सरी कोसळल्या. यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले असून वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. आज शहरभर दहीहंडीचा उत्सव साजरा होत असताना पावसामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुपारनंतर हाहाकार शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड, कूबेर गेवराई, बनगाव, जयपूर, वरझडी या परिसरात ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. काही मिनिटांच्या जोरदार सरींमुळे लाहूकी नदीला अचानक पूर आला आणि नदीचं पाणी गावात शिरलं. बनगाव आणि कूबेर गेवराई गावातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. घरगुती वस्तूंचं नुकसान तर झालंच, पण अनेक घरांची भिंतही ढासळल्याची माहिती आहे. याशिवाय, शेतांमध्ये पाणी साचून उभं पीक खरडून गेलं असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड साठी हवामान खात्याचा अलर्ट हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्यासाठी 16-17ऑगस्टसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. रायगड साठी तर 16 ऑगस्ट रोजी 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. यापूर्वी शुक्रवारीही मुंबई, ठाणे आणि पालघर साठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला होता. पालघरमध्ये रविवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, तो 19 ऑगस्टपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार सरींचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील प्रमुख भागांतील पावसाची नोंद (16 ऑगस्ट – सकाळी 5 वाजेपर्यंत) मुंबई शहर (6 तासांतली पावसाची नोंद): प्रतीक्षा नगर, सायन – 144 मिमी वरळी सीफेस – 137 मिमी दादर वर्कशॉप – 137 मिमी दादर फायर स्टेशन – 135 मिमी रावली कॅम्प – 135 मिमी पश्चिम उपनगर: मरोल फायर स्टेशन – 216 मिमी नारियलवाडी शाळा, सांताक्रूझ – 213 मिमी चकाला शाळा, अंधेरी – 207 मिमी मनपा डोंगरी शाळा, अंधेरी – 204 मिमी पश्चिम विभाग कार्यालय – 195 मिमी पूर्व उपनगर: टागोर नगर शाळा, विक्रोळी – 213 मिमी विक्रोळी पश्चिम – 211 मिमी एन विभाग कार्यालय – 204 मिमी रमाबाई शाळा, घाटकोपर – 204 मिमी पवई – 200 मिमी विक्रोळीत दरड कोसळून दोन मृत्यू मुंबई उपनगरातील विक्रोळी मध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्या ची घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेरणा डॅम ओव्हरफ्लो, पर्यटकांची गर्दी धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसामुळे तेरणा धरण ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळे डॅम वर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. अरुंद पुलावर नागरिकांची गर्दी असून, सुट्टीचा दिवस असल्याने कुटुंबासह लोक पर्यटनासाठी येत आहेत. पाण्याचा प्रवाह जरी मोठा असला, तरी प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचं चित्र दिसून येत आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/wiMIkSa
राज्यात पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन:छत्रपती संभाजीनगर-अमरावतीत ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार
August 15, 2025
0