Type Here to Get Search Results !

डोक्यावर पडा, शिबली, हातात घुंगराची काठी, पावरी:आदिवासी समाजाची मागणी- सरकारी भिक नको, आमची जमीन आमचा 7/12, संघर्ष करु, लढू!

डोक्यावर पडा म्हणजेच छत्री, हातात घोड्याची घुंगराची काठी, पावरी, शिबली ही आदिवासींची पारंपारिक वाद्य घेतलेले पुरुष उभे होते. अंगात आपली पारंपारिक वस्त्र, गळ्यात चांदीची मोठी आभूषण अशा पेहराव केलेल्या 10-12 महिला मुख्य मंडपात बसल्या होत्या. मला पाहताच करणसिंग कोकणी समोर आले. आम्ही सकाळपासून आपलीच वाट पाहत असल्याचे ते म्हणाले. कोणीतरी आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घ्यायला उत्सुक आहे याचा आनंद, उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. नवी दिल्ली येथे पार पडणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर समांतर, पण वेगळे असे विद्रोही साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडले. सांस्कृतिक विचारयात्रेने 19 व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला शनिवारी सुरुवात झाली.रविवारी (दि. 23) या संमेलनाचा समारोप झाला. या विद्रोही संमेलनात विविध कष्टकरी समाजातील लोक आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आपली पारंपारिक वाद्य घेऊन संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या आदिवासी समाजाशी 'दिव्य मराठी डिजिटल'ने विशेष संवाद साधला. आमच्या मुलांनीही शिकावे आदिवासी समाजाची एक स्वतंत्र जीवनशैली आहे. रुढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे यांच्या आधारे स्वशासन अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था अस्तित्वात होती. इंग्रजाच्या काळामध्ये त्यांचा जमीन व जंगलावरील हक्क हिरावला गेल्याने त्यांच्या स्वयंपूर्ण समाजव्यवस्थेला तडा गेला आणि त्यांचे जीवन परावलंबी झाले. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पेसा कायद्याने आदिवासी समाजाला त्यांचे अधिकार पुन्हा बहाल झाले आहेत.मात्र अजूनही आदिवासी समाज हा मागासलेल्या परिस्थितीत जगत आहे. आम्हालाही उच्चभ्रू लोकांप्रमाणे जीवन जगायचे आहे. आमच्या मुलांनीही उच्चशिक्षित व्हावे, असे आम्हाला वाटते. आदिवासी बांधवांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमचा समाजबी सुधरुन जावा धुळे जिल्ह्यातल्या साखरी या खान्देशातल्या भागातले राखी चिमन भोसले येतात. त्यांच्या हातात पडा होता. त्यांना याविषयी विचारले असता ते सांगतात, हा पडा आमचं जंगली प्राण्यांपासून रक्षण करतो. उन्हातान्हापासून ही छत्री आमचे रक्षण करतो. हजारो वर्षांपासून याचा वापर पाण्यापावसाच आम्ही करतो. मुळात शेती करणारा आदिवासी समाज निसर्गाशी आपली नाळ जोडून आहे. पुढे ते सांगतात, आम्ही पहिले तितर वगैरे पक्षी पकडायचो. बैलाच्या जागी जुंपून शेती करायचो. शिक्षण आम्हाला ठाऊकच नव्हते. पण आता आमची मुलं शिकत आहेत. पुढे जात आहेत. सरकारकडे आता एकच अपेक्षा आहे की, जी जमीन आम्ही गेली अनेक वर्षे कसतोय, त्या जमिनीचा सातबारा आमच्या नावे व्हावा. आमच्या मुलांनाही चांगले शिक्षण मिळावे. सर्व समाज पुढे जात आहेत. पण आदिवासींचा तितका विकास झालेला नाही. आता आमचा समाजबी सुधरुन जावा, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमची मातृसत्ताक पद्धती करणसिंग कोकणी हातात घोड्याची काठी घेऊन उभे होते. काठीच्या घुंगरांचा मंजुळ किणकिण करणारा आवाज वातावरणात एक वेगळीच उर्जा भरत होता. ते आपल्या समाजाविषयी पोटतिडकीन बोलू लागले. सगळे बांधव त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते. एक साधा पांढरा म्हणावा असा मळकट सदरा घातलेला हा माणूस बोलू लागल्यावर एक वेगळाच आत्मविश्वास त्यांच्या शब्दाशब्दातून बाहेर पडू लागला. ते म्हणाले, आमच्या आदिवासी समाजात पहिले मातृसत्ताक पद्धती होती. आमच्या आयाबाया शेती करायच्या. वडिलांची संपत्तीही मुलांनाही तर मुलींना मिळायची. पण आता मुलीला हटवून मुलाला अधिकार देत आहेत. मात्र आम्ही मातृसत्ताक आहोत आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो. ज्यांचे विचार चुकीचे झाले आहेत त्यांना बदलण्याचा, जनजागृतीचा प्रयत्न आम्ही करत आहोत. पण याला बदलायला वेळ लागेल. कारण त्यांना वाटते मुलगी काय दुसऱ्याच्याच घरी जाणार, तिला काय शिकवायचे ती दुसऱ्याचीच चूल फुकणार आहे. यांना सून शिकलेली पाहिजे पण मुलींना शिकवायला विरोध करणार. आमचा देव नर्मदेच्या काठी करणसिंग कोकणी पुढे म्हणतात, निसर्गाने आम्हाला भरभरुन दिले आहे. फळे, भाज्या, फुले, धान्य. देवमोगरी माता ही आमची देवी. तिला आम्ही पुजतो. निसर्गातल्या प्रत्येक जीवाची आम्ही पुजा करतो. बळीच राज्य पुन्हा यायला हवं. लोकांचे देव सोन्याचांदीच्या मंदिरात आहेत. तर आमचे देव नर्मदेच्या काठावर, झाडाखाली, निसर्गात आहेत. राष्ट्रपतींना भेटलो पण काय फायदा? राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु या आदिवासी समाजातून येतात. याविषयी करणसिंग कोकणी म्हणतात, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु महामहिम झाल्या तरी आम्हाला विशेष फरक पडलेला नाही. त्यांना दिल्लीला भेटायला आम्ही गेलो होतो. आमच्या समस्या मांडल्या. आज आमच्याकडे रस्ते नाही, पाणी नाही,विहिर नाही, रोजगार नाही. आम्हाला कामांसाठी गुजरात, नाशिक, अहमदाबाद, चांदवड याठिकाणी कामासाठी जावे लागते. कामच्या शोधात भटकत असतो. पण हाताला कायमस्वरुपी रोजगारही नाही आणि शेतीचा सातबाराही नाही. सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजून निकाल दिला. पण अजूनही आमच्या नावावर सातबारा झालेला नाही. अजून खूप संघर्ष करायचाय देवेंद्र फडणवीसांना भेटायला निघाल्यावरचा किस्सा सांगताना ते म्हणतात, पोलिस आम्हाला म्हटले कलेक्टरही तुम्हाला लवकर भेटणार नाही आणि तुम्हाला फडणवीस साहेब भेटतील असं वाटत का,त्यांच्या कपड्यांवरुन तुमच्याकडे इस्त्रीचे कपडेही नाही अस म्हणणाऱ्या पोलिसाला ते म्हणाले आम्ही फाटलेले असू पण बाटलेलो नाही. नागपुरला जात देवेंद्र फडणवीसांना गाठल्याचे ते सांगतात. त्यांच्यासमोर आमच्या समस्या मांडल्या. 50 मिनिटे ते आमच्याशी बोलले. पण अजून खूप संघर्ष करायचाय. आम्हाला माणूस म्हणून जगायचय. आमच्या मुलांनाही चांगले जीवन मिळावे. अशा इच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. भोपळा, बांबू, बैलाच्या शिंगांचे पावरी पावरी हे पारंपारिक वाद्य वाजवणारे अमरुत गुला चव्हाण म्हणातात, हे वाद्य आमच्या वाडवडिलांपासून चालत आलंय. भोपळा, बांबू, बैलाच्या शिंगांपासून हे बनवले आहे. आमच्या लग्नामध्ये ढोल, पावरीशिवाय लग्न लागत नाही. शहरातल्या डिजेला दिड लाख लागतात. तेवढ्या दिड लाखात आमचे पाच लग्न होतील. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लढलो निंबाबाई ब्राम्हणे बोलू लागतात. एकेका शब्दातून अंगारच फुलायला सुरुवात होते. सर्व लोक टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देतात. त्या म्हणाल्या, संविधान जपण्यासाठी हा आमचा लढा आहे. संविधानाला कोणी हातही लावला तर तो हात तोडण्याची धमक आमच्यात आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आम्ही सातबाऱ्यासाठी लढलो. पण अजूनही लढा सुरुच आहे. आम्हाला सरकारची भिक नको आहे पण आमच्या हक्काचं तर आम्हाला मिळावच. लाडकी बहिण योजना काढली आणि इकडे तेल दिडशे रुपयांना केलं. या पैशांचा काय फायदा? आमचा हक्क आम्हाला मिळावा. फडणवीसांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले. पण अजूनही आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/u5ynE7J

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.