''कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही'' वपु म्हणतात जित्याजागत्या माणसांवर प्रेम करावं. वपु शरीराने या जगात नाहीत, पण तरी आहेत. आपल्याला ते भेटतात. वपुंचे कुठलेही पुस्तक वाचताना एक शांत, करारी तितकाच प्रेमळ आणि आश्वासक असा आवाज येतो. संपूर्ण पुस्तक आपणच वाचत असतो, पण ऐकू येणारा आवाज वपुंचा असतो. तो आवाज खरतर आपल्या मनातल्या "वपुंचा" असतो. आपल्या लिखाणातून जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या, पण रंजक पद्धतीने सांगणारे थोर साहित्यिक म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे. ‘वपु’ ही केवळ दोन अक्षर नाहीत तर जगण्याचं एक साध, सरळ तत्वज्ञान, दुखऱ्या भागावर मायेची फुंकर, मनाच्या आजारावरचं औषध, एक निराळच रसायन. मराठी साहित्य दरबारातील एक मानाचं पान म्हणजे व. पु. काळे. आज वपुंची 93 वी जयंती. आणखी 100 वर्षांनंतरही वपु रसिकांच्या मनावर आज इतकच अधिराज्य गाजवतील. काळ कोणताही असो वपुंच लेखन मनाला भिडल्याशिवाय, डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहत नाही. वपु नावाच गारुड आजही कायम असण्यामागे काय कारण असेल? चला तर मग हेच जाणून घेऊया या विशेष बातमीतून. वपु तेव्हाचे औरंगाबाद आणि आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 वेळा येऊन गेलेत. वपुंच्या शहराशी संबंधित आठवणींना उजाळा देण्याचाही 'दिव्य मराठी डिजिटल'ने प्रयत्न केला. यात वपुंनी लुनावरचा केलेला प्रवास आणि प्रसिद्ध गायत्री भांडारची खाल्लेली कचोरीची आठवण आजही ताजी आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक सारंग टाकळकर यांच्याकडून वपुंच्या आठवणी आम्ही जाणून घेतल्या. वपु या दोन शब्दावर तमाम रसिक अजूनही तितकच प्रेम करतात. मुंबई महानगरपालिकेत काम करणारे वपु पेशाने वास्तुविशारद . पण वास्तू साकारताना त्यांनी इतकी सुंदर सुंदर अशी पुस्तके लिहिलीत की त्याला तोड नाही. वपुंचे मराठी लिखाण सामान्य माणसाच्या जीवनाला भिडणारे, समृद्ध करणारे आहे. आपण सारे, अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणसं, दोस्त, माझ्या माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फोर द रोड, रंग मनाचे, माणूस, वपुर्झा, हुंकार असे पत्रसंग्रह, ललित प्रकार खूपच प्रसिद्ध आहेत. तसेच पार्टनर, तप्तपदी, ठिकरी व वाट एकटीची यासारख्या कादंबऱ्या खूप गाजल्या. 60 पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण वपुंनी 60 पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण केले. त्यातील पार्टनर, वपूर्झा, ही वाट एकटीची यांचे कथाकथन त्यांनी स्वतः केले. या कथाकथनाला प्रेक्षकांनी भरपूर दाद दिली आणि ऑडिओ कॅसेटमधून घराघरात पोहोचणारे वपु पहिले लेखक ठरले. पेशाने आर्किटेक्ट असणारे वपु इमारतींच्या आराखड्याचे रेखन करण्यापेक्षा लेखन करू लागले आणि मराठी साहित्याला एक थोर साहित्यिक लाभला. अचानक येणारा ट्विस्ट वपुंचे लिखाण चौफेर होते. कथा, ललित, नाटक, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र्य असे सर्व लेखन प्रकार त्यांनी हाताळले. लेखनातली विशेष बाब म्हणजे कथा संपताना कथेत अचानक येणारा ट्विस्ट. त्यांच्या कथा जिवंत माणसांच्या, नातेसंबंधांच्या, स्वैर वेड्या मनाचे विविध कंगोरे अधोरेखित करणार्या असत. वपुंची कथा वाचताना डोळ्यासमोर कथेचे कथानक तरळते. कथा वाचून झाल्यावरही त्यातले एक एक प्रसंग स्लाइड शोप्रमाणे डोळ्यासमोरून सरकत राहतात. लेखकाला कथा आपली वाटावी असच वपु लिहीत असत. वपुंच्या पार्टनर, झोपाळा, आपण सारे अर्जुन, ऐक सखे, चतुर्भुज, काही खरं काही खोटं अशा अनेक पुस्तकांवर, त्यांच्या कादंबर्या आणि कथांवर वाचकप्रियतेची मोहोर उमटली आहे. चाहत्यांमध्ये तरुणांची संख्या जास्त वपुंचे ‘पार्टनर’ हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय आहे. त्यांच्या सर्व लेखनाचे, कथाकथनाचे श्रेय त्यांनी त्यांच्या पुण्याच्या चिंचोरे गुरुजींना दिले होते. व. पु. काळेंना ‘महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान’, ‘पु.भा.भावे पुरस्कार’, ‘फाय फाऊंडेशनचा पुरस्कार’ आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले. सोशल मीडियावर वपुंच्या नावाची शेकडो पाने आहेत. त्यांचे निवडक विचार, त्यांच्या पुस्तकांच्या समीक्षा या पानांवर शेअर केल्या जातात. वपुंच्या चाहत्यांमध्ये आज तरुणांची संख्याच जास्त आहे. शहरी मध्यम वर्गीयांच्या भाव भावनांच फार सुरेख चित्रण त्यांच्या कथांमधून असायचं. 1970 साली त्यांच्या कुचंबना या कथेवर एक चित्रपट राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचं नाव होतं मुंबईचा जावई. मुंबईतील जागेची समस्या व चाळीतील दोन खोल्यांच्या खुराड्यात होत असलेली एका नव विवाहित दांपत्याची अडचण दाखवलेल्या या सिनेमाच्या निर्मितीची कथाही मनोरंजक आहे. प्रत्येकाचे वपु वेगळे तुम्हाला भावलेले वपु कोणते, असा प्रश्न विचारला असता प्रत्येकाच्या मनात या लेखकाची असलेली प्रतिमा आपल्या भेटीला येते. त्यामुळे वपु खऱ्या अर्थाने वाचकांचे, प्रेम करणाऱ्यांचे, शब्दसुमनांचे आणि प्रत्येकाचेच पार्टनर आहेत. संभाजीनगरमध्ये 4 वेळा येऊन गेलेत वपु वपु चार वेळा छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन गेले. 1988 मध्ये ते पहिल्यांदा नाट्य प्रयोगासाठी आले होते. वपुंच्या पार्टनर या पुस्तकाचे नाट्य रूपांतर करण्यात आले होते. या नाटकात वपुंनी स्वतः पार्टनरची भूमिका बजावली. यात आघाडीचे कलाकार प्रमोद पवार, क्षमा राज यांनी देखील भूमिका साकारल्या होत्या. शहरातील सरस्थती भुवन शाळेच्या सुशिलादेवी जालान सभागृहात या नाटकाचा प्रयोग झाला होता. यानंतर तीन वेळा वपुंचे शहरात येणे झाले. त्यावेळी अजिंठा अॅम्बेसेडर हॉटेल दरवर्षी कोजागिरी साजरी करत असे. कोजागिरीच्या कार्यक्रमासाठी वपु दोनदा कथाकथनासाठी शहरात आले होते. सारंग टाकळकर यांनी या भेटीविषयी सांगितले. ते म्हणतात, वपु नाटयप्रयोगासाठी शहरात आले होते. त्यावेळी मी बाराव्या इयत्तेत होतो. सिटी चौकात असलेल्या लॉजमध्ये ते उतरले होते. त्या काळी नाटकातली बहुतांश मंडळी सिटी चौकातल्या लॉजमध्ये उतरत असे. त्यावेळी मी वपुंना भेटायला त्याठिकाणी गेलो, त्यावेळी ते मला म्हणाले सरस्वती भुवनचे सभागृह तुला माहित आहे का? त्या वेळी मी वपुंना त्याच महाविद्यालयात असल्याचे सांगितले. त्यावेळी वपुंना मी माझ्या लुनावर घेऊन सभागृहापर्यंत सोडते. यावेळी रस्त्याने जात असतांना शहरातील सुप्रसिद्ध रंगारगल्लीतील गायत्री कचोरी वपुंनी खाल्ली, त्यांना ती खूपच आवडली. अशी कचोरी आपण पहिल्यांदाच खाल्ल्याचे प्रतिक्रिया वपुंनी दिली. त्यानंतर वपुंच्या घरी देखील अनेकदा जाणे झाले. त्यांनी त्यावेळी त्यांच्या हातचे श्रीखंड मला खाऊ घातले. वपुंनी माझ्या लुना प्रवासाने भारावून मी त्यांना पत्रही पाठविले होते. त्या पत्राचे उत्तरही वपुंनी मला पाठवले होते. ते पत्रही आजही सारंग टाकळकर यांनी तितक्याच प्रेमाने जपून ठेवले आहे. अशा या थोर लेखकाचे 26 जून 2001 रोजी निधन झाले. 'वपु म्हणजे जीवनाचं सार , वपु म्हणजे संस्कार' वपुंचे काही विचार
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/aN6KGb9
शब्दांचा जादूगार:गुण जुळले की लग्न होतात आणि दोष जुळले की मैत्री, आयुष्याचा महोत्सव करता यावा, प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं, जयंतीदिनी जाणून घ्या वपु नावाचं गारुड!
March 24, 2025
0